वाठार किरोली : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पडलेले रेडकू वाचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या 20 वर्षीय युवक प्रशांत लक्ष्मण दळवी याच्या शोधार्थ दोन दिवस शोध मोहीम सुरु, रेडकू तलावात जखमी अवस्थेत मिळाले मात्र बेपत्ता झालेल्या युवकाचा तब्बल दोन दिवस शोध न लागल्यामुळे त्याच्या जीविताविषयी उपस्थित नागरिकांमधून आशंका व्यक्त होत आहे.
आर्वी येथील प्रशांत लक्ष्मण दळवी हा शुक्रवारी गुरे चारण्यासाठी श्री बाळोबाच्या खिंडी कडे गेला होता. दुपारी एकच्या उरमोडी कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात रेडकू पडले. कॅनॉल मधील वाहत्या पाण्यात रेडकू वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी तो कॅनॉलच्या कडेने रडत पळत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले, उतारा वरून वाहणाऱ्या पाण्याला प्रचंड वेग असल्यामुळे कॅनॉलमध्ये उतरू नकोस असं ही त्याला सांगितले.
याबाबतची माहिती त्याचे वडील लक्ष्मण जगन्नाथ दळवी यांना समजली, तात्काळ सर्व दळवी परिवार गावातील ग्रामस्थ व युवा वर्गाने कॅनॉलवर शोध सुरु केला काही अंतरावर कॅनॉलच्या कडेला त्याच्या दैनंदिन वापरातील चप्पल, टॉवेल, छत्री, डबा, पिशवी अस साहित्य मिळून आले. सर्व जणं शोध घेत पुढे गेले असता आर्वी – कोंबडवाडी हद्दीत असलेल्या तलावानजीक पाण्यात वाहून आलेले रेडकू जखमी झालेल्या अवस्थेत मिळून आले. मात्र प्रशांत दळवी मिळून आला नाही.
दुपारी सुरू झालेली शोधून मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान कॅनॉल मधील पाण्याला गती असल्यामुळे शोध कार्य रात्री थांबविण्यात आले. व उरमोडी कॅनॉल प्रशासनाला पाणी बंद करण्याची ग्रामस्थांनी विनंती केली. आज सकाळपासून रात्रीपर्यंत ग्रामस्थांनी बेपत्ता असलेल्या प्रशांत दळवीची कॅनॉल व तलाव पात्रात शोध मोहीम राबविली मात्र त्यात यश आले नाही. घटनास्थळी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश कड यांनी भेट दिली. आज रविवारी सकाळी कॅनॉलचे पाणी कमी झाल्याने शोध घेणाऱ्या आर्वी ग्रामस्थांना प्रशांत दळवी यांचा मृतदेह मिळून आला.