नवव्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, भाजपचे आजपासून महाजनसंपर्क अभियान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आमच्या आतापर्यंतच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात आम्ही प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठीच घेतला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या ट्विटर संदेशात केले आहे. आम्हाला जनतेचा उत्कट प्रतिसाद या काळात लाभला. यासंदर्भात मी जनतेचा आभारी आहे. भारताच्या विकासासाठी आम्ही आणखी कष्ट करत राहू. आमचा प्रयत्नांवर विश्वास आहे, असेही त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे.
गेल्या 9 वर्षांमध्ये सरकारने जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांची लोकांना माहिती करुन देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एक महिन्याच्या जनसंपर्क अभियानाला आज गुरुवारपासून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान 1,000 महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क साधणार असून त्यांना केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. 31 मे ते 30 जून या कालावधीत संपूर्ण देशात 50 मोठ्या जाहीर सभा आयोजित करण्यात येणार असून या सभांमधून जनतेचे आतापर्यंत झालेल्या विकासकामांसंबंधी प्रबोधन करण्यात येईल. या 50 पैकी 6 महासभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणे करणार आहेत.
गरीबांच्या कल्याणाला प्राधान्य
गेल्या 9 वर्षांमध्ये केंद्र सरकारने गरीबांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. देशाची सुरक्षा आणि विकास यांची सुनिश्चितता करण्यात आली असून त्यामुळे आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश समर्थ झाला आहे आणि जगात देशाचा गौरव वाढला आहे. विकासाची नवनवी ध्येये गाठताना नवे मापदंडही निश्चित करण्यात आले आहेत, असे अमित शहा यांनी प्रतिपादन केले.
गरीबांच्या जीवनमानात सुधारणा
गरीब आणि निम्न मध्यमर्गियांच्या जीवनमानात या 9 वर्षांमध्ये सुधारणा झाली आहे. गरीबांना, घर, वीज, आरोग्य, गॅस आणि अन्नधान्ये अशा सुविधा देऊन विकासाची फळे त्यांच्यापर्यंत पोहचतील अशी व्यवस्था सरकारने केली आहे. त्यामुळे या वर्गाला प्रथमच आपण देशाशी जोडले गेलो आहोत, अशी जाणीव झाली. अनेक विकसीत देशही अद्याप कोरोनाच्या झाकोळातून बाहेर आलेले नाहीत. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे भारताने जगातील सर्वात जास्त विकास दर या आव्हानात्मक काळातही गाठून दाखविला. भारताची अर्थव्यवस्था आज जगाचा आदर्श बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भरतेच्या मंत्राने देश कधी नव्हे, इतका भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात भाजपचे कार्यकर्ते घराघरांमध्ये पोहचून सरकारच्या कामगिरीची आणि पुढील धोरणांची माहिती जनतेला करुन देणार आहेत, असा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांसाठी ट्विटरवरुन दिला आहे.
नेत्रदीपक प्रगतीची 9 वर्षे
गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने जनतेच्या हितासाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या कामगिरीची नोंद जनता येत्या लोकसभा निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. आज भारताची आत्मविश्वासपूर्वक पद्धतीने, उत्साहाने आणि निर्धाराने विकसीत देश होण्याच्या मार्गावर जोमदार वाटचाल होत आहे, असा संदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त दिला आहे. समाजाच्या अगदी तळागाळातील माणसांपर्यंत जनहिताच्या योजनांचे लाभ पोहचतील अशी यंत्रणा या सरकारनेच उभी केली. पात्र लोकांना मिळणाऱ्या अनुदानांची सर्व रक्कम कोणताही भ्रष्टाचार न होता, त्यांच्या पदरात पडेल अशी व्यवस्था करण्यात आली. असे आतापर्यंतच्या काळात कधीही घडले नव्हते. त्यामुळे लोकांचा या सरकारवर विश्वास असून लोक भाजपच्याच पाठीशी उभे राहतील. लोकांच्या हितासाठी आम्ही केलेले कष्ट वाया जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.