वारणानगर / प्रतिनिधी
Kolhapur news : छोट्या आणि मध्यम आकाराच्या वृत्तपत्रांच्या हितासाठी सन २०२० च्या जाहिरात धोरणात सुधारणा, प्रकाशकांनी केंद्र सरकारकडे न्यूजप्रिंटवरील जीएसटी काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय बैठकीत करण्यात आली.असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम पेपर्स ऑफ इंडियाची राष्ट्रीय परिषद बैठक महाराष्ट्र युनिटच्या संयुक्त विद्यमाने वारणानगर ता. पन्हाळा जि.कोल्हापूर येथील शेतकरी भवन मधील तात्यासाहेब कोरे सभागृहात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवदत्त चंडोला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विद्येची देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज,मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांना नमन करून दीपप्रज्वलन करून सभेचे उद्घाटन करण्यात आले.या बैठकीत वृत्तपत्रांच्या समस्यांवर झालेल्या चर्चेवेळी लहान आणि मध्यम वर्गाच्या वर्तमानपत्रांच्या जाहिरातींचा हिस्सा कमी केल्याबद्दल सीबीसीचा निंषेध करण्यात आला.
यावेळी चंडोला म्हणाले, “लहान आणि मध्यम वर्गातील वृत्तपत्रांची छळवणूक अत्यंत निषेधार्ह आहे आणि छळ थांबवला नाही, तर असोसिएशनच्या सर्व राज्य युनिट्स आंदोलन करण्यास बांधील असतील,असा इशारा चंडोला यांनी डिएव्हीपीला दिला. छोट्या आणि मध्यमवर्गीय वृत्तपत्रांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये आणि जाहिरातींच्या वाट्यावरील अतिक्रमण थांबवण्यात यावे असेही सांगीतले.
असोसिएशनच्या उत्तर प्रदेश राज्य युनिटचे अध्यक्ष,प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य श्यामसिंग पनवार म्हणाले की,वृत्तपत्र प्रकाशकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आणि त्यांच्या स्तरावरून केवळ वृत्तपत्र मालकच नाही तर पत्रकारांनाही त्रास दिला जात आहे. प्रेस कौन्सिलशी संबंधित प्रकरण आणि त्याचे निराकरण यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा,असे कर्नाटकातून आलेल्या माला बोदी यांनी सांगितले.दंड टाळण्यासाठी वार्षिक रिटर्न भरण्याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.तसेच आरएनआयकडून आकारण्यात येत असलेला दंड थांबविण्याचा मुद्दा उपस्थित केला.आंध्र सरकारकडून होणाऱ्या छळवणुकीचा मुद्दा उपस्थित करून आंध्र प्रदेशातून आलेल्या के.परशुराम म्हणाले की, राज्यात पत्रकारांचा छळ शिगेला पोहोचला आहे.
हेल्पलाइन सुरू करून प्रकाशकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राजस्थानहून आलेले राष्ट्रीय सचिव डॉ.अनंत शर्मा यांनी सांगितले.
गुजरातहून आलेले सरचिटणीस शंकर एम. कटिरा म्हणाले की, लवकरात लवकर पुढील बैठक आयोजित करून प्रकाशकांच्या समस्यांवर चर्चा करून केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यात येईल.दुसरीकडे,राजस्थान राज्यातून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांच्या समस्यांवर चर्चा करताना गोपाल जी गुप्ता म्हणाले की,सरकारने लहान आणि मध्यम वर्गीय वृत्तपत्रांना सावत्र आईची वागणूक देणे बंद केले पाहिजे. तसेच भाषिक अकादमीत पत्रकारांना सहभागी करून घेण्याची मागणी केली.लघु आणि मध्यम वृत्तपत्रांच्या समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, असे मत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मध्य प्रदेशातून आलेल्या अक्रम खान यांनी पत्रकारांच्या छेडछाडीशी संबंधित घटनांचा उल्लेख करताना त्यांना रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याबाबत सांगितले. कोरापुट,ओरिसातून आलेले राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद महापात्रा म्हणाले की,आता कोणी विचारून अधिकार देत नाही,त्यामुळे घटनात्मक चौकटीत राहून ते हिसकावून घेण्याची गरज आहे.त्यांनी छोट्या श्रेणीतील वृत्तपत्रांच्या संपादकांच्या पेन्शनसंबंधी समस्या मांडल्या.यावेळी असोसिएशनसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचा महाराष्ट्र युनिटच्या वतीने गौरव करण्यात आला.