महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाची मागणी : जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
प्रतिनिधी/कोल्हापूर
करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील नवग्रह मंदीराच्या चबुतऱ्यारील होळकरांची राजमुद्रा परस्पर नष्ट करण्याचा प्रकार घडला आहे. यावरुन मंदीराचाच इतिहास बदलण्याचा डाव दिसत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना सादर केले.
जिल्हाध्यक्ष राघु हजारे, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरामध्ये अनेक शिलालेख व बहुजनांची प्रतिके असणारे संदर्भ आढळतात. अंबाबाई ही पार्वतीचा अवतार असून काही मंडळींनी हेतुपुरस्परररित्या गेल्या काही वर्षांत या संदर्भातील प्रतिके नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात भक्तांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. अलिकडे या प्राचीन मंदिरातील नवग्रह मंदिराच्या चबुत्रयावरील होळकरांची राजमुद्राच खोडून काढण्याचा प्रकार घडला आहे. हे निंदनीय असून अस्मितेवर घाला घालणारे आहे. तरी या प्रवृत्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करून ती राजमुद्रा पूर्ववत तयार करून बसवावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
हे ही वाचा : जिल्ह्यातील ४८० ग्रामपंचायतींसाठी निघणार फेरआरक्षण
शिष्टमंडळात भगवान हराळे, दीपक ठोंबरे, बाबूराव बोडके, सुरेश हराळे, अवधूत पाटील, धोंडिराम कात्रट, आण्णासो कोळेकर, बबलू फाले, सुनिल बोडेकर, बाबूराव गावडे आदींचा समावेश होता.