पुणे / प्रतिनिधी :
ओशो आश्रम विकण्याचा घाट घालणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध एकत्र येत ओशो रजनीश यांच्या शिष्यांनी निदर्शने केली. याबरोबरच मंगळवारी 70 व्या ओशो संबोधी दिवसानिमित्त कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाच्या गेटवर जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य दाखल झाले.
यावेळी बोलताना स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना, ओशो प्रेमींना गळय़ामध्ये माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. आश्रमाची जागा विकण्यासाठी काढली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गाने आम्ही आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आश्रम व्यवस्थापनाने आज आम्हाला आतमध्ये प्रवेश करण्यास मुभा दिली आहे. शिष्यांना संन्याशी माळा घालून आतमध्ये प्रवेश दिला. आमच्या लढय़ाला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, आश्रम आणि ओशो विचार वाचवण्याचा आमचा लढा यापुढेही चालू राहणार आहे.
अधिक वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर यांचे निधन
अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर व्यवस्थापनाने आश्रमात प्रवेश करण्यास मुभा दिल्याने ओशो शिष्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु, आश्रमाच्या आतील समाधीची, स्विमिंग पूल व ध्यान केंद्रांची बिकट झालेली अवस्था पाहून शिष्यांनी नाराजी व्यक्त केली. ओशो आश्रमाला पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे अनेकांनी व्यक्त केले.