स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधींनी दिली कबुली : लोकशाहीच्या अधिकारांचे रक्षणसाठी संघर्ष
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. मानहानी प्रकरणी कमाल शिक्षा होऊन खासदार म्हणून अपात्र ठरेन, असा विचारही केला नव्हता असे राहुल यांनी कॅलिफोर्नियातील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित एका व्याख्यानाला संबोधित करताना म्हटले आहे. मोदी मानहानी प्रकरणात कमाल शिक्षा मिळाल्याने आश्चर्य वाटले होते, परंतु हेच राजकारण आहे. खासदार म्हणून अयोग्य घोषित करण्यात आल्यावर मला एक लाभ झाला आहे. आता लोकांसोबत मिळून काम करत आहे. आम्ही सरकारच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात संघर्ष करत होतो आणि याचदरम्यान मला शिक्षा ठोठावण्यात आली. भारतात लोकशाहीवादी संस्थांना कब्जात घेण्याच्य विरोधात तसेच लोकशाहीवादी अधिकारांसाठी सर्वजण संघर्ष करत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
फोन टॅपिंगचा आरोप
माझा मोबाइल फोन सरकारकडून टॅप करविण्यात आला होता असे सांगत त्यांनी स्वत:च आयफोन धरून त्यात थट्टेच्या सुरात ‘हॅलो मिस्टर मोदी’ असे म्हटले. देशात प्रत्येक व्यक्तीसाठी देखील डाटा गोपनीयतेचे नियम तयार केले जावेत. जर एखाद्या देशाने तुमचा फोन टॅप करायचे ठरविल्यास त्याला कुणीच रोखू शकत नाही असे माझे मानणे आहे, असे वक्तव्य राहुल यांनी केले आहे.
चीनसोबतचे संबंध जटिल
चीनच्या दबाबाखाली भारत मागे हटू शकत नाही. दोन्ही शेजारी देशांमधील संबंध जटिल असून ते सुधारण्याची शक्यता तूर्तास दिसून येत नाही. चीनने आमच्या काही क्षेत्रावर कब्जा केला आहे. भारताला कमजोर करू असे चीन समजत असल्यास ती त्याची चूक ठरेल असे राहुल म्हणाले.
अशीच भूमिका राहिली असती
पाश्चिमात्य देशांच्या दबावानंतरही रशियासोबतचे संबंध कायम राखण्याच्या भारताच्या धोरणाचे राहुल यांनी यावेळी समर्थन केले. रशियासोबत आमचे वेगळ्या स्वरुपाचे संबंध आहेत. रशियावर आम्ही काही प्रमाणात निर्भर आहोत. याचमुळे याप्रकरणी मोदी सरकारप्रमाणेच माझी भूमिका राहिली असती. भारत अत्यंत मोठा देश असून त्याला स्वत:च्या हिताकरता संधी शोधाव्या लागतील. देशाच्या प्रगतीसाठी अन्य देशांसोबत संबंध प्रस्थापित करावे लागतील. आम्ही नेहमी सर्वांशी संबंध राखण्याचा प्रयत्न करू, असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.
भाजपकडून लक्ष्य
राहुल गांधी यांना केवळ खोटंच बोलता येते. राहुल गांधींना भारताबद्दल चुकीची माहिती फैलावणेच जमते. विदेशात गेल्यावर भारताचा अपमान करणे हेच राहुल यांचे एकमेव लक्ष्य असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात घडवून आणलेला विकास राहुल यांच्या पचनी पडत नसावा. राहुल यांच्या द्वेषाच्या बाजाराला संपविण्याचे काम जीडीपीची आकडेवारी करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत वेगाने विकास करत असल्याचे जीडीपीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचे उद्गार भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काढले आहेत.