हरिप्रिया एक्स्प्रेस धावतेय बेळगावपर्यंतच : प्रवाशांची मागणी अखेर पूर्ण
बेळगाव : रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीमुळे तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावत आहे. त्यामुळे बेळगाव रेल्वेस्थानक ते कोल्हापूर, पुणे, सांगली या मार्गावर थेट बससेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून रेल्वेस्थानकातून दररोज पाच ते सहा बस थेट कोल्हापूरला सोडण्यात आल्या आहेत. सुलधाळनजीक रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावत आहे. दि. 6 ते 13 एप्रिल दरम्यान ही एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावणार असल्याने रेल्वेस्थानकात उतरलेल्या प्रवाशांना थेट बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. काही प्रवाशांनी तर यापूर्वीच बेळगाव परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना ट्विटकरून माहिती दिली होती. कोल्हापूर, मिरज, सांगली येथील प्रवासी बेळगाव रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर त्यांना मध्यवर्ती बसस्थानक गाठावे लागत होते. यावेळी काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट केली जात होती. ज्याठिकाणी 100 ते 200 रुपये भाडे आकारले जाते, त्याठिकाणी गर्दीचा फायदा घेत 400 ते 500 रुपये घेतले जात असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. शुक्रवारपासून रेल्वेस्थानकातून 5 ते 6 बस सोडल्या जात आहेत. तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने वाहतूक करत आहेत. यामुळे परिवहन मंडळालाही चांगला महसूल मिळत आहे.