यंदा साडेतीन लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
वार्ताहर /काकती
बेळगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांचा एकमेव मार्कंडेय साखर कारखाना आहे. कारखान्याला ऊस पाठविणे, ऊसतोडणी टोळी, वाहतूक पुरवठा यासाठी शेतकऱयांनी पुढाकार घ्यावा, शेतकऱयांच्या समृद्धीबरोबरच कारखान्याची प्रगती देखील होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी केले.
ऊस उत्पादक आणि कारखान्याला ऊस पुरवठा व्यवस्थानाबद्दल विशेष बैठक कारखाना कार्यस्थळी मंगळवार दि. 14 रोजी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी अविनाश पोतदार होते. व्यासपीठावर संचालक मनोहर हुक्केरीकर, अनिल कुट्रे, बसवराज घाणगेर, भाऊराव पाटील, परशराम कोलकार, मनोहर होनगेकर, सद्याप्पा राजकट्टी, लक्ष्मण नाईक, नीलिमा पावशे, वसुधा म्हाळोजी, माजी संचालक मनोज पावशे उपस्थित होते.
अविनाश पोतदार म्हणाले, पहिल्या वर्षी ट्रायलला 71 हजार मे. टन, दुसऱया वर्षी 120 हजार मे. टन तर गेल्यावर्षी 195 मे. टन उसाचे गाळप केले. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ऊस गाळपाला सुरुवात करणार आहोत. किमान 3 लाख 50 हजार मे. टन उस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱयांच्या खात्यावर 48 कोटी जमा करण्यात आले असून 2 कोटी येत्या पंधरवडय़ात जमा करणार आहोत. मनोहर हुक्केरीकर म्हणाले, उसाचे सर्वाधिक गाळप करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती मंडळांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे व्यवस्थापनात पारदर्शकता येणार आहे.
मनोज पावशे म्हणाले, प्रवर्तक रामभाऊ पोतदार यांनी कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास साधण्याचे ध्येय बाळगले होते. ते साध्य करण्यासाठी ऊस आपल्या हक्काच्या कारखान्याला पाठवावा, असे आवाहन केले. संचालक अनिल कुट्रे म्हणाले, उसाच्या रिकव्हरीनुसार ऊसतोडणी करणार असल्याचे सांगून आभार मानले. यावेळी काकती, होनगा, केदनूर, देवगिरी, सांबरा, हिरेबागेवाडी, उचगाव, कडोली आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.