शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून
सावंतवाडी : प्रतिनिधी
रत्नागिरी – सिंधूदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये कमी कालावधी मध्ये जास्त पाऊस पडत असल्यामुळे केंद्रीय मंत्रालयाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन या जिल्ह्यामध्ये भात पिकाचे नुकसान कशामुळे होते याची पाहणी करण्यासाठी वातावरण फाउंडेशनचे संचालक भगवान केशभट यांनी नेमळे गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी लावणी करत असताना अति पाऊस पडत असल्यामुळे डोंगर माथ्यावरचा गाळ,पाला पाचोळा, माती पाण्याबरोबर भात शेतीत वाहून आल्याने लावणी कुजून जाते. काही लावणी पाण्याबरोबर वाहून जाते. अति पाऊस पडत राहिला तर भात पिकाची वाढ कमी होते. यामुळे पीक कमी येते. लावणी केल्यावर दहा -पंधरा दिवस पाऊस गेल्यावर पिकाला करपा रोग, निळा भुंगा, कीड रोग अशा रोगाचा धोका असतो. तसेच गवारेडे, माकड, मोर, डुक्कर, साळींदर , अशाप्रकारचे वन्य प्राणी भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यानंतर भात पिकल्यानंतर परतीच्या पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सतत पडत असलेल्या पावसामुळे भात पीक जमिनीवर पडते . पिकावरून पाणी गेल्याने पीक कुजून जाते. तसेच पिकाला कोंब आल्यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भात पेरणीवेळी जमिनीची मशागत, पॉवर ट्रिलरचा खर्च, विकतचे बियाणे,लावणी, कापणी करतेवेळची मजुरी मिळून हा सर्व खर्च चाळीस ते पंचेचाळीस हजार एवढा येतो.