खोदाई करताना ठिकठिकाणी जलवाहिन्यांचे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरात ड्रेनेजवाहिन्या घालण्याचे काम मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र अद्यापही हे काम अपूर्णच आहे. अनगोळ परिसरात ड्रेनेजवाहिन्या घालण्यासाठी 15 ते 20 फूट खोल चरी खोदण्यात येत आहेत. मात्र चरी खोदताना जलवाहिन्या, गॅसवाहिन्या आणि मोबाईल केबलचे नुकसान होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प होण्याचा प्रकार वाढला असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
शहराचा विकास करून स्मार्ट सिटी बनविण्यासाठी विविध योजनांतर्गत नागरी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. शहरवासियांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची बाब चांगली आहे. ही विकासकामे राबविण्यास जनतेचा कोणताच आक्षेप नाही. मात्र विकासकामे राबविण्यासाठी नियमावली आणि पूर्ततेसाठी वेळेचे बंधन घालण्यात आले की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
एखादी योजना राबविण्यासाठी मोठ्या थाटामाटात शुभारंभ केला जातो. मात्र या योजनांची पूर्तता वेळेत केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील सांडपाणी नदी-नाल्यांना व तलावांमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे वाहते पाणी दूषित होत आहे. हे रोखण्यासाठी शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन हलगा परिसरात याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच अमृत योजनेंतर्गत 47 किलो मीटर अंतराच्या ड्रेनेजवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू करून तीन वर्षे उलटली. पण अद्यापही कामाची पूर्तता झाली नाही.
ठिकठिकाणी हे काम अर्धवट झाले आहे. सध्या अनगोळ परिसरात काही ठिकाणी मुख्य ड्रेनेजवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. याकरिता 15 ते 20 फूट खोल खोदाई केली जात आहे. ड्रेनेजवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करताना जलवाहिन्या आणि ड्रेनेजवाहिन्यांचे नुकसान होत आहे. ड्रेनेजवाहिन्या फुटल्याने पाणी वाया जात असून नागरिकांचा पाणीपुरवठादेखील बंद केला जात आहे. दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्याने नागरिकांना तीन ते चार दिवस पाण्याविना काढावे लागत आहेत.
ड्रेनेजवाहिन्या घालण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. खोदण्यात आलेल्या चरी वेळेवर बुजविल्या नसल्यास वाहनधारक तसेच लहान मुले पडण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे मोबाईल केबल आणि भूमिगत विद्युत वाहिन्यांचे नुकसान होत आहे. अशा विविध समस्यांमुळे येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकसान झालेल्या जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच खोदण्यात आलेल्या चरी लवकर बुजवून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे.