प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात वाढणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशप्रमाणे लव्ह जिहाद विरोधी विशेष पोलीस पथकाची स्थापना करावी, तसेच हलाल प्रमाणपत्र रद्द करावे, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने शुक्रवारी सुवर्णविधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले.
लव्ह जिल्हादच्या माध्यमातून धर्मांतराचे प्रकार वाढले आहेत. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा असूनही लव्ह जिहादच्या घटना वारंवार घडत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रायचूर येथे दोन घटना घडल्या. परंतु अद्याप त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यात आलेला नाही. धर्मांतर करून त्यांना आतंकवादी संघटनांशी जोडले जात असल्याचे उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधी पथक स्थापन केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल. राज्यात अनधिकृतपणे हलाल लोगो असलेले प्रमाणपत्र उत्पादनांवर छापले जात आहे. केंद्र सरकारची प्रमाणपत्र देणारी संस्था असूनही हलाल प्रमाणपत्र का छापले जात आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच हे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता मोहन गौडा, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, मारुती सुतार, बाळू कुरबर, पंकज घाडी, विनय नंदगडकर, सुधीर हेरेकर, ऋषिकेश गुर्जर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.