प्रतिनिधी /बेळगाव
स्वरमल्हार फौंडेशनतर्फे अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात शनिवारी पहाटे पं. विनोद डिग्रजकर आणि रुद्रनाथ कुलकर्णी या कोल्हापूरच्या गुरु-शिष्यांचे गायन झाले.
प्रथम सत्रामध्ये युवा कलाकार रुद्रनाथने राग अहिर भैरवमध्ये ’बनरा मोरा’ ही विलंबित एकतालातील बंदिश व त्यानंतर ‘अलबेला सजन आयो रे’ ही मध्यलय त्रितालमधील बंदिश सादर केली. त्याने ‘आम्हा न कळे ज्ञान’ हा संत चोखोबांचा अभंग सादर करून आपले गायन संपविले. रुद्रनाथने मुलायम आवाजात अहिर भैरवची मांडणी अतिशय सुरेख केली.
बैठकीच्या दुसऱया सत्राची सुरुवात कोल्हापूरचे दिग्गज गायक पं. विनोद डिग्रजकर यांनी ‘मिया की तोडी’ रागाने केली. त्यांनी विलंबित एकतालातील ’दैया बाट दुबार’ व द्रुत एकतालमधील ’जी गुनियन में गाये बजाये’ ही बंदिश पेश केली.
त्यानंतर ‘खट तोडी’ या अप्रचलित रागातील ’धन धन री बंदिश’ व गुजरी तोडीतील ’बेगुन गुण’ ही बंदिश सादर केली. यानंतर ’घेई छंद मकरंद’ हे कटय़ार काळजात घुसली नाटकातील झपतालातील नाटय़गीत व ’संत भार पंढरीत’ हा संत जनाबाईंचा अभंग गाऊन आपल्या गायनाचा शेवट ’शिव के मन शरण हो’ या प्रसिद्ध भैरवीने केला.
आधी शिष्य रुद्रनाथ व नंतर गुरु विनोदजांनी आपल्या दमदार सुरेल गायकीने सर्व श्रोत्यांना तृप्तीचा मनमुराद आनंद दिला. शेवटची दोन्ही पदे तर अतिशय भावपूर्ण आणि भक्तिरसात न्हाऊन चिंब करणारी अशीच होती. सर्व कलाकारांना त्रिगुण पुजारी, राहुल मंडोळकर, अंगद देसाई आणि सारंग कुलकर्णी यांनी तितकीच भरीव आणि रंगतदार साथसंगत केली.
सुरुवातीला सुनीता देशपांडे, डॉ. स्नेहा राजुरीकर, नितीन कुलकर्णी, त्यांच्या मातोश्री प्रभा कुलकर्णी तसेच युवा कलाकार रुद्रनाथ यांनी दीपप्रज्वलन केले. रोहिणी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अर्चना ताम्हणकर यांनी कलाकारांचा परिचय करून आभार मानले.