मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अधिकाऱ्यांना सूचना : 1 ऑगस्टला गृहज्योती तर 17-18 ऑगस्टला गृहलक्ष्मीला मिळणार चालना
बेंगळूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांपैकी गृहज्योती योजना 1 ऑगस्टला आणि गृहलक्ष्मी योजनेला 17 किंवा 18 ऑगस्टला चालना देण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. गृहज्योती योजना आणि गृहलक्ष्मी योजनेसंदर्भात त्यांनी गुरुवारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेऊन चर्चा केली. सर्व गॅरंटी योजनांसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी केली पाहिजे. अनावश्यक माहिती व कागदपत्रे मागू नयेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अर्ज फेटाळले जात असतील तर त्याचे योग्य कारण असले पाहिजे. केवळ बहाणा करून अर्ज नाकारता येणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. सर्व योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा सबमिशन होणार आहे. त्यामुळे सेवा सिंधू पोर्टलची क्षमता वाढविण्याचे निर्देश ई-प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.
‘गृहज्योती’तील संभ्रम दूर करा
कलबुर्गी येथे 1 ऑगस्ट रोजी गृहज्योती योजना सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबतचे सर्व संभ्रम दूर करून नागरिकांना जागरूक करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सेवा सिंधू पोर्टलद्वारे गृहज्योती योजनेसाठी नोंदणी करू शकता. याशिवाय हेस्कॉमच्या सर्व कार्यालयांमध्ये हेल्प डेस्क उभारण्यात येणार आहेत. 15 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. बेंगळूर वन, कर्नाटक वन, ग्राम वन केंद्रांवर आणि घरबसल्या संगणक किंवा मोबाईल अॅपद्वारे अर्ज करण्याची संधी दिली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बेळगावमध्ये गृहलक्ष्मी योजनेला चालना?
बेळगावात 17 किंवा 18 ऑगस्ट रोजी गृहलक्ष्मी योजना सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. 15 जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या योजनेसाठी सेवा सिंधू पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे, नेम्मदी केंद्रामध्ये वैयक्तिकरित्या अर्ज करू शकता. त्यासाठी स्वतंत्र काउंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉ. रजनीश गोयल, ऊर्जा खात्याचे अप्पर मुख्य सचिव गौरव गुप्ता, महिला व बालकल्याण खात्याच्या सचिव डॉ. एन. मंजुळा, महसूल खात्याचे सचिव राजेंद्रकुमार कठारिया, मुख्यमंत्र्यांचे सचिव एन. जयराम, वित्त विभागाचे सचिव पी. सी. जाफर, ई-प्रशासन विभागाच्या संचालिका मीना नागराज यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.