जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी/ सांगे
जलस्रोत खाते हे शेतकऱयांसाठी असून गेल्या काही वर्षांत जे शेतकरी शेतीपासून दूर गेलेले आहेत त्यांना तसेच नवीन शेतकरी व युवावर्गाला शेती व्यवसायाकडे आणण्यासाठी त्यांना आधार देण्यात येणार आहे. जलस्रोत खाते शेतकऱयांप्रती गंभीर असून त्यांना योग्य पाणीपुरवठा व्हावा यादृष्टीने प्रयत्नरत आहे. सांगे तालुक्यासाठी पाच फिल्ड कर्मचारी लिडर्सची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रत्येकी पाच पाणी वितरण सोसायटय़ा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतकऱयांकडे संवाद वाढून नवीन शेतकऱयांना शेती व्यवसायात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगे येथे दिली.
सांगे मतदारसंघातील शेतकऱयांना भेडसावणाऱया विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सांगे जलस्रोत विभागाचे अधिकारी आणि फिल्ड कर्मचाऱयांसोबत मंत्र्यांनी बैठक घेतली. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक पाजीमळ येथील विश्रामधामात पार पडली. यावेळी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला आणि ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱयांना देण्यात आले. यावेळी जलस्रोतमंत्र्यांनी अभियंते व फिल्ड कर्मचाऱयांना कामांची तसेच क्षेत्रांची वाटणी करून दिली. सांगेसाठी पाच फिल्ड कर्मचारी लिडर्सची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा जबाबदाऱया देण्यात आल्या अहेत. शेती उत्पादन वाढविणे आणि शेतकऱयांच्या समस्या सोडविणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
संजीवनी साखर कारखाना चालविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. दोन-तीन महिन्यांत चित्र स्पष्ट होणार असून खासगी क्षेत्रातील एक स्पर्धात्मक कंपनी त्यातून मिळू शकते, असे मंत्री शिरोडकर यांनी उसपिकावर बोलताना सांगितले. ऊस शेतकऱयांचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, शेती विकासाच्या बाबतीत जलस्रोतखाते योग्य पद्धतीने कार्यरत करण्यासाठी मंत्री शिरोडकर कार्य करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत सांगे मतदारसंघात ते पाच वेळा आले. खात्याच्या कर्मचाऱयांना त्यांनी एक शिस्त घालून दिली आहे. त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. महिन्याभरात 300 शेतकरी शेती करण्यास पुढे येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी जगला पाहिजे आणि त्याचे उत्पन्न वाढले पाहिजे यावर भर देण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. या बैठकीला कृषी खात्याचे अधिकारी तसेच कर्मचाऱयांना बोलाविण्यात आले होते. यावेळी जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.