आज अखेर १६० उमेदवारी अर्ज दाखल
वाकरे / प्रतिनिधी
कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ८० उमेदवारांनी ८७ उमेदवारी अर्ज दाखल केले.मंगळवारअखेर १६० उमेदवारी अर्ज दाखल झाले. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार दि.६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.पहिल्या दिवशी २ उमेदवारांनी तर सोमवारी ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
मंगळवारी ९७ उमेदवारी अर्जांची विक्री तर मंगळवार अखेर विक्रमी ५९८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. आज ८० उमेदवारांनी दुबार अर्जासह ८७ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे मंगळवार अखेर १३९ उमेदवारांनी १६० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील व माजी सरपंच युवराज उर्फ बाळ पाटील (कुडित्रे),कुंभी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव ज्योती पाटील (खुपिरे),करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके (म्हारूळ), सरपंच सज्जन पाटील (महे), भाजपाचे के.एस.चौगुले (कोतोली), सुभाष पाटील (लोंघे), विठ्ठल पाटील (पनुत्रे), तर इतर मागासवर्गीय गटातून सांगरूळचे माजी उपसरपंच सुशांत नाळे यांनी अर्ज दाखल केले.
सोमवारी गटवार दाखल झालेल्या अर्जांची संख्या
गट क्रमांक १ -९
गट क्रमांक २- १६
गट क्रमांक ३ – ६
गट क्रमांक ४ – १७
गट क्रमांक ५ – ४
अनुसूचित जाती जमाती – ३
महिला प्रवर्ग १५
इतर मागासवर्गीय गट -१६
भटक्या व विमुक्त जाती जमाती – १
दरम्यान कारखान्याचे विद्यमान चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील “नरके आघाडीचे” उमेदवार एकत्रितरित्या बुधवार दि.११ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार दि.१२ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे बुधवार आणि गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रचंड गर्दी होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.