1952 पासून सुरू झालेला चिन्हांचा प्रवास आजही सुरू; पूर्वी ‘शिक्का’ तर आता ‘बटण’ इतकाच बदल
विश्वास दिवे, कोल्हापूर
Kolhapur Political News : शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पक्षाची मालकी आणि शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाण चिन्हावरून रामायण सुरु झाले. चिन्हाची लढाई महाभारत घडण्यापर्यंत गेली. संगणक आणि सोशल मीडियाच्या जमान्यातही निवडणूक चिन्हाला महत्व असून उमेदवाराचे आणि राजकीय पक्षाचे ‘फेसबुक’ समजले जाणारे उमेदवारी चिन्ह निवडणूक प्रक्रियेत निर्णायक भूमिका पार पाडत असते. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना चिन्हाचाही प्रचार करावा लागतो.
स्वातंत्र्यानंतर 1950 च्या नवीन घटना आणि नवीन कायद्यानुसार 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळेपासून सुरू झालेला चिन्हांचा प्रवास आजही सुरू आहे. पूर्वी ‘शिक्का’ तर आता ‘बटण’ एवढाच त्यात बदल झाला आहे. निवडणुकीत अनेकांच्या भवितव्याचा फैसला हे चिन्ह करीत असल्यामुळे उमेदवारास मतदारांच्या मनावर आपले चिन्ह बिंबवावे लागते. त्यासाठी प्रचारात विविध प्रकारे चिन्हाचा वापर केला जातो. 1952 ला झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील निरक्षर मतदारांची संख्या 85 टक्क्यांपेक्षा जास्त होती. त्यामुळे त्या निवडणुकीत चिन्ह हे महत्त्वाचे ठरले.
25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर 1951 मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह ठरविण्यासाठी राजकीय पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत काँग्रेस, शेकाप व समाजवादी पक्षांनी ‘नांगर’ या चिन्हावर दावा केला होता. यावेळी काँग्रेसला ‘मानेवर जू’ असलेली बैलजोडी हे चिन्ह मिळाले. समाजवादी पक्षाला ‘झाड’ हे चिन्ह देण्यात आले होते. मानेवर जू असलेली बैलजोडी हे चिन्ह 1967 पर्यंत काँग्रेसकडे होते. 1969 मध्ये काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर ते चिन्ह गोठविण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला ‘गाय वासरु’ हे चिन्ह मिळाले होते. 1977 ला काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडल्याने इंदिरा गांधींनी ‘हात’ हे चिन्ह घेतले. या तिन्हीही चिन्हांनी काँग्रेसला यश मिळवून दिले होते. सध्या ‘हात’ हे चिन्ह काँग्रेसचे असले, तरी ते अगोदर कामगार नेते आर. एस. रुईकर यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे चिन्ह होते. मात्र, निवडणुकीत रुईकर यांच्या पक्षाला यश न मिळाल्याने तसेच हा पक्ष जे. बी. कृपलानी यांच्या प्रजा समाजवादी पक्षात विलीन झाल्याने ‘हात’ हे चिन्ह गोठविण्यात आले होते .जनसंघाचे निवडणूक चिन्ह ‘पणती’ होते. जनसंघ जनता पक्षातून फुटल्यानंतर भारतीय जनता पार्टी या नावाने अस्तित्वात आली आणि त्यांनी ‘कमळ’ हे चिन्ह घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसला ‘घडय़ाळ’ हे चिन्ह मिळाले आहे. शरद पवार यांचे सहकारी पी. ए. संगमा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘घडय़ाळ’ चिन्हावर दावा केला होता.
चिन्ह कशासाठी
पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा निरक्षर लोकांना पक्ष लगेच कळावा या उद्देशाने निवडणूक चिन्हांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यांना लिहिता-वाचता येत नाही त्यांना चित्रांच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या पक्षाला मतदान करायचे आहे, हे लवकर लक्षात येईल, यासाठी निवडणूक चिन्हांचा वापर करण्यास सुरुवात झाली होती.
कशाच्या आधारावर दर्जा मिळतो
चारपेक्षा जास्त राज्यामध्ये सध्या असलेल्या तसेच देशभरात झालेल्या एकूण मतदानाच्या किमान सहा टक्के मत मिळविणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. त्यापेक्षा कमी राज्यात कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्षांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळतो. त्या पक्षाकडे राज्यातील विधानसभेच्या तीनपेक्षा जास्त जागा आवश्यक असतात, त्यांनाच चिन्ह मिळते.
अपक्षांची कसरत
निवडणुकीत उतरलेल्या अपक्ष किंवा स्थानिक आघाड्यांना चिन्ह मिळविण्यासाठी रस्सीखेच करावी लागते. मिळालेले चिन्ह रुजविण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कपबशी, नारळ, पतंग उगवता सूर्य, टी. व्ही., अशी प्रसिद्ध चिन्हे घेण्यासाठी उमेदवार आग्रही असतात.
पशुपक्षी-प्राण्यांची सुटका
चिन्हांसाठी पशुपक्षासह प्राण्यांचा वापर केला जायचा. त्यामुळे उमेदवारांकडून प्राणी, पशुपक्षांना थेट प्रचारात आणले जायचे. यावर आक्षेप आल्यानंतर पशुपक्षी, प्राणी यांच्या उमेदवारी चिन्हांवर बंदी आणली गेली आहे. मात्र, बहुजन समाज पक्षाचा ‘हत्ती’ मात्र अजूनही प्रचारात आहे.
शिवसेनेच्या चिन्हाचा इतिहास
1968 मध्ये शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक ढाल-तलवार चिन्हावर लढवली होती. 1980 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. तर 1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, उगवता सूर्य, बॅट-बॉल अशी वेगळी चिन्हे मिळाली होती. छगन भुजबळ मशाल चिन्ह घेऊन जिंकले होते तर वामनराव महाडिक उगवता सूर्य चिन्ह घेऊन जिंकले होते. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह 1985 पासून होते. शिवसेनेला 1989 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. 1989 नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर लढवल्या.