ग्राम पंचायत-महानगरपालिकेचेही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष : वाहनधारक-नागरिकांसाठी रस्ता वाहतुकीला गैरसोयीचा : खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक-यमनापूर मेन रस्त्यावर राजू पावशे यांच्या घराजवळ गेल्या कित्येक महिन्यापासून पडलेले मोठे खड्डे बुजविण्याकडे ग्रा. पं. बरोबर महानगरपालिकासुद्धा दुर्लक्ष करत असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांसाठी हा रस्ता वाहतुकीला गैरसोयीचा ठरला आहे. संबंधित शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीनी लक्ष देऊन खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीला सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.यमनापूरकडे जाणाऱ्या या मेन रस्त्यावर राजू पावशेंच्या घराजवळ मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याबद्दल यापूर्वीसुद्धा ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध झाले असूनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. कंग्राळी बुद्रुक गावाला राज्य परिवहन मंडळाने केएलई हॉस्पिटलमार्गे व शाहूनगरमार्गे दोन्हीकडूनही बसेसची व्यवस्था करून शालेय विद्यार्थ्यांबरोबर नोकरदार, व्यावसायिक व इतर प्रवासीवर्गाची चांगली सोय केलेली आहे. परंतु या ठिकाणी पडलेल्या खाड्यांमुळे बसचालकालासुद्धा बस चालवताना कसरत करावी लागत आहे. तसेच इतर चारचाकी व दुचाकी वाहनधारकांनासुद्धा कसरत करावी लागत आहे. परंतु खड्डे बुजविणे ग्रा. पं. व महानगरपालिका या दोघांकडूनही दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणे मनपा हद्दीतील रस्त्यावर खड्डे
कंग्राळी बुद्रुक-यमनापूर रस्त्यावर पडलेल्या ख•dयांबद्दल अजून का खड्डे बुजविले नाहीत, असे ग्रा. पं. ला नागरिकांनी विचारले असता, राजू पावशेंच्या घरापासून यमनापूरपर्यंतचा हा रस्ता महानगरपालिका हद्दीमध्ये येतो. तेव्हा महानगरपालिकेने हे खड्डे बुजविले पाहिजेत, असे उत्तर मिळाले. तेव्हा सदर वॉर्डाचे लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेचे शासकीय अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन रस्ता वाहतुकीला सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रोज हजारो लिटर पाणी गटारीत
राजू पावशे यांच्या घराजवळील महानगरपालिकेच्या हद्दीतील सदर रस्त्याच्या बाजूला हिडकल धरणातून आलेल्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह आहे. या व्हॉल्व्हमधून याठिकाणी रोज हजारो लिटर पाणी गटारीला जात आहे. एकीकडे पावसाळा लांबल्यामुळे काही धरणांची पाण्याची पातळी खालावत असल्यामुळे पाणीटंचाईची समस्या समोर दिसत आहे. तसेच कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे महाराष्ट्रातील धरणातील पाणी कर्नाटकामध्ये सोडून सहकार्य करण्याची विनंती करण्यात येत आहे. मात्र कर्नाटकातील पाणीपुरवठा मंडळाकडून मात्र कंग्राळी बुद्रुक येथे आलेल्या व्हॉल्व्हमधून दररोज हजारे लिटर पाणी गटारीत सोडून पाण्याची नासाडी करत आहेत. तेव्हा या खात्यावर कोणाचे निर्बंध आहेत की नाही, अशीही प्रतिक्रिया महिलावर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत. तसेच खड्डे पडलेल्या रस्त्याच्या बाजूलाच सदर व्हॉल्व आहे. या भागात पाणीपुरवठा सुरू केल्यास सदर ख•dयामध्येही हे पाणी साचत आहे. यामुळे याकडे पाणी बंद करण्याकडेडी दुर्लक्ष तर दुसरीकडे खड्डे बुजविण्याकडेही दुर्लक्ष, तेव्हा या शासनाला कुणी वाली आहे की नाही, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मग गावच्या प्रवेशद्वारावर पडलेले खड्डे अन् सांडपाणी कुणाच्या हद्दीत?
गावच्या प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. अन् त्या खड्यात सांडपाणी तुंबले आहे. त्या सांडपाण्यातून वाट काढताना प्रत्येकाला नाकाला हात धरावा लागत आहे. नजिकच्या घराचे सांडपाणी रस्त्यावर येऊन तेथे डबकी तयार झाली आहेत. त्या दुर्गंधीयुक्त वासामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंग्राळी बुद्रुक-यमनापूर रस्त्यावर पडलेले खड्डे ग्रामपंचायत हद्दीत येत नाहीत, असे सांगण्यात येत आहे. मग प्रवेशद्वारातील खड्डे आणि साचलेले सांडपाणी कुणाच्या हद्दीत येते. निदान या खड्यांची तरी ग्रामपंचायतीने दुरुस्ती करावी आणि साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, असा संतप्त सवाल करून या समस्येकडे तरी ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.