अतिक्रमण रोखण्यास महापालिकेला अपयश : व्यापारी संकुलाचा वापर भाजीपाला अन् बारदान ठेवण्यासाठी : लाखो रु. वाया गेल्यात जमा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याच्यादृष्टीने महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मोहिमेअंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण करून ठाण मांडलेल्या भाजी विक्रेत्यांना आणि फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई राबविली जाते. मात्र भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर अतिक्रमण करण्यास व्यापारीच प्रोत्साहन देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांसाठी भव्य असे व्यापारी संकुल बांधण्यात आले होते. मात्र या व्यापारी संकुलाचा वापर सध्या गोडावून म्हणून केला जात आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी व्यापारी संकुलाचा वापर भाजी विक्री करण्याऐवजी भाजीसाठा आणि बारदान ठेवण्यासाठी केला जात आहे. यामुळे लाखो रूपये खर्चून बांधण्यात आलेले संकुल कुचकामी ठरले आहे. कारण ज्या भाजी विक्रेत्यासाठी सोय करून देण्यासाठी व्यापारी गाळे तयार करण्यात आले त्याच विक्रेत्यांनी याकडे पाठ फिरवून रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. यामुळे बाजारपेठेतील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. परिणामी बाजारपेठेत ये-जा करण्यासही रस्ता शिल्लक राहिला नाही. संपूर्ण बाजारपेठेतील रस्त्यावर हवे तसे अतिक्रमण केले आहे.
कांदा मार्केटमध्ये रस्ते गायब
अतिक्रमण रोखण्यास महापालिकेला अपयश आले आहे. कांदा मार्केटमध्ये काही भाजी विक्रेत्यांनी तर अक्षरक्ष: दहा ते पंधरा फूट रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास येते. त्याचप्रमाणे दक्षिण आणि उत्तरेकडे तेंड करून बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी मध्यभागी दहा फूट जागा सोडून ठाण मांडल्याने रस्तेच गायब झाले असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशातच काही व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर भाजी विक्रेत्यांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. यामुळे बाजारपेठेत वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. इतकेच नव्हे तर पादचाऱ्यांना चालत जाण्यासाठी रस्ता नसतो. रस्ता मोकळा करण्याच्यादृष्टीने आजवर महापालिकेने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. मात्र याबाबत तक्रारी वाढल्याने बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांना शिस्त लावण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने अधून मधून हाती घेण्यात येते.
भाजी विक्रेत्यांना हटविण्यास दुकानदारांचा विरोध
नरगुंदकर भावे चौक येथील भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे परिसरात काही अंशी शिस्त लागली आहे. त्याचप्रमाणे ही मोहीम कांदा मार्केट आणि चावी मार्केट परिसरात राबविण्याची आवश्यकता आहे. पण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. याकरिता रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याची सूचना महापालिकेकडून करण्यात येते. मात्र भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी काही व्यापारीच प्रोत्साहन देत असून भाजी विक्रेत्यांना हटविण्यास दुकान व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काही दुकानासमोर दोन ते तीन भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. दुकानासमोर व्यवसाय थाटण्यासाठी दुकानमालकांना काही भाजी विक्रेते भाडे देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाजी विव्रेत्यांची गर्दी वाढली आहे.