वार्ताहर /उचगाव
आपल्या रोजच्या धावपळीतून वेळ काढत जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचालित श्री मळेकरणी हायस्कूलमधील सन् 1990-91 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्याला या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत देत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी शिक्षकांचे स्वागत व सन्मान करत शिक्षकांप्रती आदर आणि प्रेम इतक्मया वर्षांनंतरही कायम आहे हे दाखवून दिले. यापुढेही प्रत्येक वर्गमित्राच्या सुख-दुःखात सहभागी होत आमची आदर्शवत वाटचाल राहील, त्याचबरोबर शाळेचा विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहत असेल तर सढळ हस्ते मदत केली जाईल, असा निर्धार याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
स्नेहमेळाव्याला निवृत्त मुख्याध्यापक एस. बी. मरूचे, मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले, निवृत्त शिक्षक बी. बी. शिंदे, डी. एस. मुतकेकर, बी. एस. पाटील, एल. वाय. कावळे, एम. एम. तिगडी, वसुंधरा आजगावकर, जी. के. तुप्पट उपस्थित होते. सर्व गुरुजनांना मानाचा भगवा फेटा बांधून, शाल घालून आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव शिक्षकांच्यावतीने गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. स्वागत सुनील पावशे यांनी केले. गुरुजनांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.
यावेळी तुकाराम वेताळ, मोनाप्पा पाटील, परशराम मरूचे, उदय देसाई, बाळू कोवाडकर, रामदास चौगुले, सुनीता देसाई, रोहिदास हांडे, अनिता लाळगे, मंगल पाटील यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.प्रारंभी विद्यार्थिनींनी औक्षण करून व फुलांचा वर्षाव करत सर्व गुरुजनांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. फीत कापून स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन नारायण वेताळ यांनी केले. सुनील पावशे यांनी आभार मानले.