कोलकाता / वृत्तसंस्था
सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ तथा के. के. यांचे मंगळवारी रात्री उशीरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून संशयास्पद स्थितीत झालेला आहे असा आरोप होत असून त्यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश पश्चिम बंगाल राज्य सरकारने दिला आहे.
मंगळवारी रात्री कोलकाता येथे रात्री एक संगीत कार्यक्रम आटोपून ते परतले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचा मृत्यू झाला. तथापि, त्यांच्या चेहऱयावर आणि डोक्यावर मार लागल्याच्या खुणा दिसून आल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजचे परीक्षण करण्यात येत आहे.
नझरुल मंच येथे संगीत कार्यक्रम झाल्यानंतर कृष्णन यांनी त्यांना अतिशय उकडत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना कार्यक्रमानंतर त्वरित सभागृहाच्या बाहेर नेण्यात आले होते. ते उकडत असल्याची तक्रार करत असल्याचा व्हिडीओही प्रसारित झालेला आहे. ज्या सभागृहात त्यांचा कार्यक्रम झाला, त्याची प्रेक्षक क्षमता 2,500 आहे. मात्र, तेथे या कार्यक्रमाला 5 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
सभागृहाचा एसी बंद
कार्यक्रमाच्या वेळी सभागृहाचा एसीही बंद होता. प्रचंड गर्दी असल्याने आणि खेळती हवा नसल्याने तसेच प्रचंड उकाडा यामुळे कुन्नथ यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि त्यांना हृदयविकारचा झटका आला असा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सभागृह व्यवस्थापनाविरोधात त्यांच्या निकटवर्तीयांनी तक्रारही दाखल केल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे हा मृत्यू वादग्रस्त बनला आहे.
भाजपकडून संताप व्यक्त
सभागृहाच्या व्यवस्थापनावर कुव्यवस्थापनाचा आणि दुर्लक्षाचा आरोप केला जात आहे. प्रचंड गर्दीच्या वेळी काही प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्यता असते. तथापि, व्यवस्थापनाने स्थिती वेळीच नियंत्रणात आणावयास हवी होती. तसेच राज्य सरकारनेही कुन्नथ यांच्यासारख्या अतिमहत्वाच्या लोकप्रिय व्यक्तींच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशीलता दर्शविली नाही. त्यामुळे पश्चिम बंगालचे राज्य सरकारही या मृत्यूला जबाबदार असल्याची कठोर टीका भाजप नेते दिलीप घोष यांनी केली. पश्चिम बंगाल राज्यात आता अनागोंदी माजली असून राज्य सरकारचे कोणत्याही बाबीवर कोणनेही नियंत्रण राहिलेले नाही, असाही आरोप त्यांनी केला.