जलद रेल्वेगाडय़ांना थांबा देण्याची मागणी, रेल्वे अधिकाऱयाने समजूत काढल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित, योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या कोकण रेल्वे स्थानकावर जलद रेल्वेंना थांबा देण्यात यावा या मागणीसाठी काणकोणच्या ज्येष्ठ नागरिकांनी पुकारलेल्या उपोषणाला शुक्रवारी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सरकारने याबाबतीत जर योग्य असा निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन उग्र करण्याचा निर्धार ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर उद्भवणाऱया परिस्थितीला सरकार जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवारी दुपारी कोकण रेल्वेचे अधिकारी सुनील नारकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन समजूत काढल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी 9 पासून हातात फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक रेल्वे स्थानकावर जमा झाले होते. त्यात महिला वर्गाचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. ज्येष्ठ नागरिकांनी पंधरा दिवसांपूर्वी यासंबंधीचे निवेदन दिल्याने कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कोकण रेल्वे स्थानकावर कडक पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली होती. मामलेदार मनोज कोरगावकर, पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, संदेश चोडणकर, पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर, काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस या ठिकाणी उपस्थित होते.
20 वर्षांपूर्वी काणकोणातून कोकण रेल्वेमार्ग नेण्यासाठी जे आंदोलन करण्यात आले होते त्यात सहभागी झालेले कार्यकर्ते आज ज्येष्ठ झालेले आहेत. त्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर सरकारने त्यावेळी गुन्हे दाखल केले होते. काणकोणच्या जमीनमालकांनी कोकण रेल्वेसाठी 5 रु. दराने त्यावेळी जमिनी दिल्या. मात्र आज महसुलाचा प्रश्न समोर करून काणकोणच्या रेल्वे स्थानकावर कित्येक रेल्वे थांबविण्यात येत नाहीत. आज काणकाण्sाची स्थिती बदलेली आहे. देशी-विदेशी पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. मोपा विमानतळामुळे काणकोणातून मोपापर्यंत जाणे महागात पडणारे आहे. अशा वेळी कोकण रेल्वे हा एकमेव सुलभ मार्ग असताना काणकोणच्या नागरिकांना या सेवेपासून वंचित करण्यात येत असल्याचा आरोप उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला.
भाजप कार्यकर्त्यांचा बहिष्कार ?
20 वर्षांपूर्वी काणकोणात जे कोकण रेल्वेसाठी आंदोलन झाले होते त्याला पाठिंबा देण्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रवींद्रनाथ रायतूरकर, मुरलीधर राणे, माजी मंत्री डॉ. काशिनाथ जल्मी, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद देसाई आघाडीवर होते. मात्र शुक्रवारच्या आंदोलनात काणकोणातील भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले नाहीत. काणकोणचे आमदार असलेले सभापती रमेश तवडकर यांनीही दखल घेतली नाही. काणकोण पालिकेच्या 12 नगरसेवकांपैकी धीरज गावकर, शुभम कोमरपंत वगळता अन्य नगरसेवक दिसले नाहीत. काणकोणातील पंचायतींचे सरपंच, पंच या आंदोलनात दिसले नाहीत. कोकण रेल्वेचा लाभ केवळ आंदोलकांनाच हवा आहे काय, भाजप कार्यकर्ते त्याचा लाभ घेणार नाहीत काय, असे संतप्त सवाल यावेळी उपस्थित नागरिकांनी केले.
गोव्यात काँग्रेसची राजवट होती त्यावेळी आपण काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते असूनही त्या आंदोलनात सहभागी झालो होतो, अशी माहिती यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी दिली. या वयातही काणकोणवासियांच्या न्याय्य हक्कांसाठी आघाडीवर राहण्याची आपली तयारी असल्याचे त्यांच्यासह शांताजी गावकर, अनिल भगत, आम आदमी पक्षाचे संदेश तेलेकर, राजू राणे, रमाकांत बांदेकर, माजी नगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई यांनी सांगितले.
खासदार, रेल्वे मंडळाची भेट घेणार
रेल्वेगाडय़ा थांबवाव्यात या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, सभापती रमेश तवडकर यांची आणि रेल्वे मंडळाची भेट घेऊन त्यांना निवेदने देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक उल्हास पै भाटीकर, अनिल भगत, झुलो शेट, दिलखुश शेट, रत्नाकर काणकोणकर, नाटिविदाद डिसा, आर. एस. नाईक, रमेश देसाई तसेच जनार्दन भंडारी, राजू राणे, राजेंद्र देसाई, शांताजी गावकर, आशा नगर्सेकर आणि इतरांचा सहभाग राहिला. काणकोणच्या रेल्वे स्थानकावर दिवसाला 14 हजार रु. इतका महसूल मिळायला हवा, मात्र तो मिळत नाही, अशी खोटी माहिती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. दिवसाला किमान 50 प्रवासी या स्थानकावरून ये-जा करत असतात आणि ऑनलाईन बुकिंगमुळे हा हिशेब जुळत नाही. रेल्वेचे अधिकारी विनाकारण सबबी पुढे करतात, असा आरोप यावेळी करण्यात आला.
19 रोजी मामलेदार कार्यालयात विशेष बैठक
दरम्यान, मामलेदार मनोज कोरगावकर यांच्या मध्यस्थीनंतर 19 रोजी सकाळी 11 वा. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मामलेदार कार्यालयात विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुनील नारकरे, मामलेदार कोरगावकर, ज्येष्ठ नागरिक मंचाचे कार्यकर्ते, राजेंद्र देसाई, शांताजी गावकर, अनिल भगत, दिलखुश शेट, संदेश तेलेकर, जनार्दन भंडारी आणि अन्य प्रमुख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शांताजी गावकर यांनी दिली.