प्रतिनिधी/कसबा बावडा
जुलै महिन्याच्या अखेरीस लागलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याखाली गेलेल्या राजाराम बंधाऱ्यावरून अजूनही दोन फुट पाणी वाहत असून पाटबंधारे विभागाकडून लावण्यात आलेले बॅरीगेट्स काढून काही वाहतूकदार जीवघेणा प्रवास करत आहेत. काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली असली तरी सध्या राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याचा प्रवाह अजूनही जास्त आहे. पण काही वाहनधारक जीव धोक्यात घालून यावरून प्रवास करत आहेत.
दरम्यान सलग पंधरा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने गेली आठ दिवस उघडीप दिल्याने रविवारी बंधाऱ्यावरील पाणी काहीअंशी ओसरले असून अजूनही दोन फुट पाणी बंधाऱ्यावरून वाहत आहे.
यावर्षी मोसमी पावसाने कमी वेळेत जोरदार सुरुवात केल्याने 4 जुलै पासून गेली वीस दिवस कोल्हापूर पद्धतीचा राजाराम बंधारा पाण्याखाली गेला होता. काही दिवस पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाल्याने बंधाऱ्यावरील पाणी काही अंशी ओसरले असून रविवार सकाळपासूनच काही प्रवासी बंधाऱ्यावरील पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. पाटबंधारे खात्यांनी लावलेले बॅरीगेट्स बाजूला करून वाहतूकदार पाण्यातून गाडी घालत आहेत. वडणगे, निगवे, आंबेवाडी, पन्हाळा येथील शिरोली एमआयडीसीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजाराम बंधारा हा जवळचा व सोयीचा मार्ग असून रत्नागिरी महामार्गाला जोडणारा मार्ग आहे. त्यामुळे काही दिवस येथे शाहूपुरी पोलिस खात्याने पोलिस कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.