संबंधित यंत्रणेसमोर पूर नियोजनाचे आव्हान : पुलांची मालिका महापुराला कारणीभूत ठरणार : शहर हद्दीत महामार्गावर 4 पुलांची उभारणी
विवेक गिरी /खानापूर
बदललेल्या हवामानाचा फटका गेल्या तीन वर्षांपासून खानापूरला बसत आहे. यंदाही पर्जन्यमान सरासरीएवढे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. संपूर्ण वर्षभर पाऊस पडत असल्याने नदी-नाल्यांचे पात्र वाहते आहे. त्यामुळे यंदा पावसाळय़ात पहिल्याच पावसात नदीला पाणी येणार आहे. गेल्या तीन वर्षात जुलै, ऑगस्टमध्ये झाला तसा पाऊस यंदाही झाला तर खानापूर शहराला निश्चितच महापुराचा धोका आहे. बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे पर्जन्यमान्य बदललेले आहे. सरासरीएवढा पाऊस झाल्यास नक्कीच महापुराचा धोका संभवतो. यासाठी नगरपंचायतीसह संबंधित खात्यांनी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यापूर्वी 118 वर्षांपूर्वी तसेच 55-56 साली मलप्रभा नदीला महापूर आला होता. त्यानंतर 2019 ते 2021 अशी सलग तीन वर्षे महापुराने खानापूर शहराचे बरेच नुकसान केले आहे. शहरात नव्याने झालेली उपनगरे मारुतीनगर, दुर्गानगर, आश्रय कॉलनी, पोलीस क्वॉर्टर्स या महापुराच्या तडाख्यात सापडली. त्यात अनेक घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. 2019 साली आलेले महापुराचे पाणी लगेचच ओसरले. गेल्या वर्षीही पूर आला, मात्र त्याचे पाणी म्हणावे तितक्या लवकर ओसरले नाही. याचा फटका मारुतीनगर येथील नागरिकांना बसला.
पुलांसाठीचा भराव ठरू शकतो कारण
बेळगाव-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यात मराठा मंडळ पदवी कॉलेजपासून गोवा क्रॉस करंबळ या दोन कि. मी. अंतरात मोठे चार पूल बांधण्यात आले. या पुलांचे बांधकाम करताना मातीचा भराव टाकून पुलांच्या दोन्ही बाजूच्या लॉकींग ब्लॉक भिंतींमुळे दोन कि. मी. परिसर पूर्ण अडवला गेला आहे. त्यामुळे नदीला येणाऱया महापुराचे पाणी ओसरण्यास जागाच राहिली नाही. नदीपात्रातून जेवढा पाण्याचा विसर्ग होईल तेवढेच पाणी ओसरणार असल्याने महापुराचा धोका जास्तीत जास्त मारुतीनगर व दुर्गानगर वासियांना आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढली तर तितक्याच वेगाने विसर्ग होणे जरुरीचे असते. त्यामुळे पुराचा धोका टळतो.
बंधाऱयांमुळे पाणी प्रवाहात अडचण
मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांमुळे नदीचे पाणी फार काळ अडून राहणार आहे. त्यामुळे साध्या पावसातही पुराचा धोका संभवतो. तांत्रिकदृष्टय़ा चुकीच्या पद्धतीने पुलांची उभारणी ही येथील महापुराचे कारण आहे. महामार्गासाठी बांधलेले पूल हे पिलरवर उभे करून खालील जागा खुली ठेवली असती तर पाण्याचा विसर्ग होण्यास मार्ग मोकळा झला असता. मात्र, मातीचे भराव टाकून बांधण्यात आलेल्या पुलांमुळे पाणी विसर्ग होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या पुलांचे बांधकामही पुराच्या पाण्यामध्ये ढासळणार आहे. मलप्रभा नदीवर असोगा, खानापूर, कांजळे, जळगे, यडोगा अशा जागोजागी ब्रिजकम बंधारे बांधण्यात आल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवला जातो. त्यामुळे पाणी लवकर पात्राबाहेर पडत आहे. कणकुंबी, जांबोटी परिसरात होणाऱया अतिवृष्टीमुळे मलप्रभा नदीला पूर येत आहे. गेल्या तीन वर्षांचा अनुभव पाहता कमी वेळेत जास्त पाऊस होत असल्याने पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढते. विसर्गास मात्र अडथळे निर्माण झाले आहेत. याबाबत आता शासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी झालेल्या महापुरानंतर केंद्रीय व राज्यस्तरावरील पूर नियोजन मंडळाचे अधिकारी खानापूरला येऊन पाहणी करून गेले. त्यांनी याबाबत कोणते नियोजन केले, हे अद्याप समजलेले नाही. नगरपंचायत, महसूल खाते यांनी याबाबत तात्काळ बैठका घेऊन पूर परिस्थितीबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. हवामानातील उष्णता पाहता यंदाही पर्जन्यमान मोठय़ा प्रमाणात होण्याचे संकेत मिळत आहेत. बदललेल्या हवामानामुळे कणकुंबी, जांबोटी या भागात 4 तासात 25 इंच पावसाची नोंद गेल्या दोन वर्षात सातत्याने होत आहे. त्यामुळे पुराचा धोका निर्माण होत आहे.
पाणी विसर्गात अडचणी
मलप्रभा नदीचा उगम कणकुंबीत होतो. या ठिकाणी 4000 चौरस कि. मी. इतकी व्याप्ती या परिसराची आहे. या परिसरात चेरापुंजीच्या बरोबरीने पाऊस होतो. या ठिकाणी पडणाऱया पावसामुळे नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी येते. त्यामुळे नविलुतीर्थ येथील धरणात पाणीसाठा केला जातो. खानापूर तालुक्यातून नदीला जोडणाऱया नाल्यांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे नदीला पाणी मोठय़ा प्रमाणात जमा होते. नविलुतीर्थ धरणाच्या खालील नदीपात्रात अतिक्रमण झाल्याने पात्रच कमी झाले आहे. त्यामुळे धरणातून योग्य विसर्ग करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
धरणसाठय़ात किमान 70 टक्के पाणी शिल्लक राहणे गरजेचे असते. यासाठी विसर्गावर निर्बंध येत आहेत. पावसाळय़ात कमी वेळेत जास्त पाऊस होत असल्याने धरणातील पाण्याचा साठा लवकर पूर्ण होत आहे. जर पूर नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात करणे गरजेचे आहे. मात्र, धरणक्षेत्राच्या खाली पात्रच अरुंद झाल्याने विसर्ग मोठय़ा प्रमाणात केल्यास बदामीपर्यंत महापुराचा धोका निर्माण होतो. यासाठी पाटबंधारे खाते, महसूल खाते यांनी नियोजन करणे गरजेचे आहे.