आजच्या कर्नाटकाच्या निकालावरून भाजप हा पराभव सहजासहजी मान्य करणार नसून घोडेबाजारासारख्या क्लृप्त्या करण्याच्य़ा शक्यता नाकारता येत नाहीत असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. तसेच ज्या पापातून भाजपने कर्नाटकात सरकार स्थापन केले होते तीच गोष्ट महाराष्ट्रालाही लागू होते असही ते म्हणाले. ते टिव्ही-9 या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपने कर्नाटकात ज्या प्रकारे 2018 ला सत्ता स्थापनेसाठी ज्या हालचाली केल्या होत्या त्याच हालचाली महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन करताना केली आहे असा आरोप केला. ते म्हणाले “भाजपा कर्नाटकात झालेला पराभव सहन करणार नसून काहीतरी क्लृप्त्या सुरूच ठेवील. भाजपने कर्नाटक आणि महाराष्ट्रात अशा दोन्ही ठिकाणी घोडेबाजार करून सरकार पाडलं असा निष्कर्ष काढावा लागेल. यासाठी पैशांचा प्रचंड मोठा गैरवापर झाला. तसेच केंद्रीय चौकशी संस्थांचा देखिल गैरवापर झाला. तसेच उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवण्यात आले” असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी “ज्या पापातून भाजपने कर्नाटकात सरकारची स्थापना केली तीच महाराष्ट्राच्या बाबतीतही लागू होते. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याकरता जे व्यवहार करावे लागले, आर्थिक व्यवहार केले, याबाबत कॉंग्रेसने रेटलिस्ट लोकांसमोर आणली होती. सत्तास्थापनेसाठी खर्च झालेला पैसा वसूल करण्याकरता वसुली सरकार सुरू झालं. कर्नाटकात भाजप सरकार कोणत्याही कामासाठी ४० टक्के कमिशनवर काम करत होते. ही ऐकिव माहिती नसून याविषयी पुरावे आहेत. एका कंत्राटदाराने पंतप्रधानांना पत्र लिहून सरकारचं आणि संबंधित मंत्र्याचंही नाव लिहिलं होतं. मात्र दुर्दैवाने त्या कंत्राटदाराने नंतर आत्महत्या केली” असं पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांनी माहीती दिली.