ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत आहे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पराभव आहे. आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने त्यांनी बजरंगबलीला मैदानात उतरवले. मात्र, बजरंगबलीची गदा भाजपच्याच डोक्यावर पडली, अशी टीका खा. संजय राऊत यांनी भाजपवर केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील कल स्पष्ट झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 130 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपची गाडी 66 जागांवर अडखळली आहे. कर्नाटकात काँगेस विजयी होणार असेल, तर हा मोदी आणि शाह यांचा पराभव आहे. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून समोर आली. कर्नाटकात तेच होत आहे, जे 2024 मध्ये महाराष्ट्रात होणार आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बहुमत मिळत असल्याने काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.