तिकीट खरेदी करावे लागणार नाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधत 5 ते 15 ऑगस्टदरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित सर्व स्मारके आणि वारसास्थळांवर फ्री एन्ट्री (मोफत प्रवेश) देण्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत पर्यटकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिली.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अंतर्गत संरक्षित सर्व स्मारकांमध्ये 5 आणि 15 ऑगस्टदरम्यान प्रवेश विनामूल्य असेल. देशातील सर्व संरक्षित स्मारकांमध्ये प्रवेशासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी बुधवारी दिली. सोशल मीडियावर घोषणा करताना रेड्डी यांनी एएसआय स्टेटमेंट शेअर केले. स्वातंत्र्यदिन सोहळय़ाचा एक भाग म्हणून 5 ते 15 ऑगस्ट या कालावधीत कोणत्याही तिकीट असलेल्या मध्यवर्ती संरक्षित स्मारके तसेच पुरातत्व स्थळ संग्रहालयांमध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे त्यात म्हटले आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ या मोहिमेअंतर्गत भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश हाही त्याचाच एक भाग आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या इतर नेत्यांनी मंगळवारी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर ‘तिरंगा’ ठेवण्याचे आवाहन केले आहे.