वृत्तसंस्था /बेंगळूर
येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर यजमान भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या डावात 293 धावा जमविल्या. भारत ‘अ’च्या डावामध्ये ऋतुराज गायकवाडने शानदार शतक (108) तर उपेंद्र यादवने अर्धशतक (76) झळकवले.
तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिले दोन्ही सामने अनिर्णित राहिल्याने हा शेवटचा सामना उभय संघांच्या दृष्टीकोनातून उभय संघ विजय नोंदविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या शेवटच्या सामन्यात भारत ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंड ‘अ’ संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारत ‘अ’ संघाचा पहिला डाव 86.4 षटकात 293 धावांत आटोपला. ऋतुराज गायकवाडचे शतक आणि उपेंद्र यादवचे अर्धशतक ही पहिल्या दिवसाच्या खेळातील वैशिष्टय़े ठरली. न्यूझीलंड ‘अ’ संघातील गोलंदाज फिशरने 4 तर डफी आणि वॉकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
कर्णधार पांचाळ आणि ईश्वरन यांनी संघाच्या डावाला सावध सुरुवात करताना सलामीच्या गडय़ासाठी 40 धावांची भागीदारी केली. पांचाळने केवळ 5 धावा जमविल्या. ईश्वरनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 38 धावा केल्या. गायकवाड आणि रजत पाटीदार या जोडीने संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 45 धावांची भर घातली. पाटीदारने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला सर्फराज खान याला खाते उघडता आले नाही. गायकवाड आणि उपेंद्र यादव यांनी पाचव्या गडय़ासाठी 134 धावांची भागीदारी केल्याने भारत ‘अ’ संघाला 293 धावांपर्यंत मजल मारता आली. गायकवाडने 127 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 108 तर उपेंद्र यादवने 2 षटकार आणि 9 चौकारांसह 76 धावा जमविल्या. राहुल चहरने 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा केल्या. भारताच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडतर्फे फिशरने 52 धावात 4 तर डफी आणि वॉकर यांनी प्रत्येकी 2 त्याचप्रमाणे सोलिया आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ प. डाव 86.4 षटकात सर्वबाद 293 (ऋतुराज गायकवाड 108, उपेंद्र यादव 76, ईश्वरन 38, राहुल चहर 13, फिशर 4-52, डफी 2-56, वॉकर 2-65, सोलिया 1-47, रविंद्र 1-68).