राहुल गांधींच्या युद्धसंबंधी वक्तव्यावर भाजपची सडकून टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तावांग येथे चीनी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडून भारतीय सीमेचे संरक्षण केल्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी भारतीय सैनिकांची प्रशंसा केली आहे. लडाख येथील गलवान खोऱयातही भारतीय सैनिकांनी चीनला मागे रेटून अतुलनीय धैर्याचे दर्शन घडविले होते. अन्य कोणत्याही देशाची भूमी ताब्यात घेण्याचा भारताचा हेतू नसला, तरी आपल्या भूमीचा एक इंचही भारत गमावणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केले. ते ते फिक्कीच्या 95 व्या वार्षिक संम्मेलनात प्रमुख अतिथी या नात्याने भाषण करीत होते.
सीमापारकडून होणाऱया घुसखोरीच्या प्रयत्नांना आपले सैनिक ज्या प्रकारे अयशस्वी ठरवत आहेत, त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काही लोक सैनिकांच्या पराक्रमावर आणि क्षमतेवर तसेच शौर्यावर संशय व्यक्त करतात. हे सर्वथैव अयोग्य आणि अश्लाघ्य आहे, अशी टीकाही त्यांनी गांधींवर केली.
ते चीनची भाषा बोलतात
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनीही राहुल गांधींवर जोरदार शरसंधान केले. चीन युद्धाची तयारी करीत आहे. भारत सरकार मात्र झोपलेले आहे. या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करुनही ते जागे व्हावयास तयार नाही, असे विधान शुक्रवारी गांधी यांनी जयपूर येथे केले होते. या वादग्रस्त विधानामुळे भारतीय सैनिकांच्या सीमा संरक्षणाच्या क्षमतेवरच गांधी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले असून जनतेची दिशाभूल चालविली आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलतात. त्यांना चीनने भारतावर आक्रमण करावे असे वाटते का ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे. ते खोडसाळ भाषा करुन लोकांच्या मनात चिंता निर्माण करीत आहेत, अशी टीका होत आहे.
खोटेपणा करणे राजकारण नव्हे
देशाच्या संरक्षणासंबंधीच्या मुद्दय़ांवरही काही लोक खोटारडेपणा करुन राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. समाजाचे प्रबोधन करणे, समाजाला योग्य मार्गाने नेणे याला राजकारण म्हणतात. समाजाची दिशाभूल करणे हे घातक आहे, अशीही टीका राजनाथसिंगांनी केली.
सैनिक देशाचा मानबिंदू
आपल्या सैन्यदलांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा आम्हाला अभिमान आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्यांमुळे जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. तथापि, लोकांचा भारताच्या सैन्यदलांवर विश्वास असल्याने ते विरोधी पक्षांच्या बनावट टीकेकडे दुर्लक्ष करीत आहेत. विरोधी पक्षांचे काही नेते जेव्हा सैनिकांच्या पराक्रमावरच संशय व्यक्त करतात, तेव्हा ती देशभक्ती निश्चितच नसते. राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट येथील वायुहल्ल्यावरही संशय व्यक्त केला होता. यामुळे त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच सिद्ध होते. भारताची जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका नड्डा यांनी केली.
राहुल गांधी जेव्हा एसीत असतात…
राहुल गांधी सध्या पदयात्रा करीत आहेत. वातानुकुलीत कंटेनरमध्ये ज्यावेळी विश्रांती घेत असतात तेव्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भर उन्हात सैनिकांसह राहून सीमेवर त्यांचा उत्साह वाढवत असतात. पंतप्रधान मोदी दिवाळीही आपल्या घरी नव्हे तर सैनिकांसह व्यतीत करतात. राहुल गांधी यांनी त्यांच्या मर्यादेत रहावे आणि मर्यादेत बोलावे, अशी टिप्पणी भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली. चीनच्या युद्धखोरीसंबंधी जी मुक्ताफळे राहुल गांधी यांनी उधळली आहेत, त्यांसाठी त्यांनी सैनिकांची आणि देशाची क्षमा मागावी अशी सूचना त्यांनी केली.