सर्व पदांचा राजीनामा हायकमांडकडे सादर ः नवा पक्ष स्थापण्याची तयारी
नवी दिल्ली, श्रीनगर / वृत्तसंस्था
पाच दशकांहून अधिककाळ काँग्रेस पक्षात सक्रियपणे कार्यरत असणारे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पाच पानांचे राजीनामापत्र पाठवून दिले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेस पक्षातील स्थितीविषयीच्या काही महत्त्वपूर्ण टिप्पण्या केल्या असून सर्वात कठोर विधान राहुल गांधी यांच्यासंबंधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्यांना भाजपने ‘ऑफर’ दिल्याची चर्चा आहे. मात्र, ते स्वतः नवा पक्ष स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे.
जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद दीर्घकाळापासून पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठविले नव्हते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी काश्मीरमधील पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या जी-23 बंडखोर गटाचे महत्त्वाचे सदस्य आझाद यांनी काँग्रेसमधील बदलांबाबत सोनिया गांधींना पत्रही लिहिले होते. या पत्रानंतर बराच गदारोळ झाला होता. त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला पक्षातील सुधारणांबाबत वेळोवेळी सतर्क केले होते. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांच्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी पक्षापासून फारकत घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा उल्लेख केला आहे. आपल्या विद्यार्थी जीवनात त्यांच्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांचा प्रभाव होता, असेही त्यांनी लिहिले आहे. 1975-76 मध्ये संजय गांधींच्या विनंतीवरून त्यांनी जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले. कुठलाही स्वार्थ न ठेवता अनेक दशके पक्षाची सेवा केल्याचे आझाद यांनी लिहिले आहे.
राहुल गांधींचा घेतला ‘समाचार’
आपल्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत होता, असे आझाद यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पण, दुर्दैवाने राहुल गांधींचा सक्रिय पक्षप्रवेश झाल्यापासून विशेषतः 2013 नंतर तुम्ही राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या स्वतंत्र ढाच्याची संपूर्ण ब्लू पिंटच उद्ध्वस्त करून टाकली आहे, असा थेट हल्लाबोल त्यांनी केला. जेष्ठ तसेच सर्व अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आले आहे. अननुभवी नेते पक्षाचा कारभार पाहू लागले, असेही त्यांनी लिहिले आहे.
जी-23 नेते नेतृत्वावर नाराज
गुलाम नबी आझाद हे पक्षावर बऱयाच दिवसांपासून नाराज होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांची केंद्रशासित प्रदेशातील पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. परंतु आझाद यांनी ही ऑफर धुडकावून लावत राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर आझाद यांना पुन्हा वरच्या सभागृहात पाठविण्यात आले नाही.
राजीनाम्यावर प्रकाशझोत….
स्वतःबद्दल ः मी सलग चार दशके काँग्रेस कार्यकारिणीचा सदस्य होतो. 35 वर्षे मी देशाच्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पक्षाचा सरचिटणीस-प्रभारीही होतो. ज्या राज्यांमध्ये मी प्रभारी होतो, त्यापैकी 90 टक्के राज्ये काँग्रेसने जिंकली, हे सांगताना मला अभिमान आणि आनंद वाटत आहे.
सोनियांबद्दल ः काँग्रेस अध्यक्ष या नात्याने तुम्ही युपीए-1 आणि युपीए-2 च्या स्थापनेत खूप चांगले काम केले. या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुम्ही अध्यक्ष या नात्याने सुज्ञ सल्लागार आणि वरि÷ नेत्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवला, अधिकार दिला.
राहुलबद्दल ः दुर्दैवाने राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आणि विशेषतः जानेवारी 2013 मध्ये जेव्हा तुम्ही त्यांना उपाध्यक्ष केले, तेव्हा राहुलने पक्षातील मार्गदर्शक यंत्रणा उद्ध्वस्त केली. सर्व ज्ये÷ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला केले गेले आणि गैर-अनुभवी असलेल्यांचा एक नवीन गट तयार झाला. त्यानंतर परिस्थिती ढासळत गेली.
पक्षाविषयी ः संपुआ सरकारची अखंडता नष्ट करणारी रिमोट कंट्रोल यंत्रणा आता काँग्रेसवर लागू केली जात आहे. केवळ नावापुरते तुम्ही या पदावर बसला आहात. राहुल गांधी सर्व आवश्यक निर्णय घेत आहेत. त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे त्यांचे निकटचे सहकारी आणि पीए काही महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.