विनाअपघात वाहने चालविणाऱया चालकांचा गौरव
प्रतिनिधी /बेळगाव
खासगी वाहनांपेक्षा सरकारी वाहने सुरक्षित असतात. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी सरकारी वाहनांचाच वापर अधिक करावा, असे आवाहन पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.
येथील बस स्थानक आवारात बुधवारी सायंकाळी वायव्य परिवहन मंडळातील विनाअपघात वाहने चालविणाऱया चालकांना सुवर्ण व रौप्यपदक वितरीत केले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, खासगी वाहनांबरोबर सरकारी वाहनांची स्पर्धा सुरू आहे. सुरक्षिततेवर भर दिला जात नाही. यासाठी नागरिकांनी सरकारी वाहनांनाच प्राधान्य द्यावे.
उत्तमरित्या वाहने चालवून पुरस्कार मिळविणाऱया चालक व वाहकांचे कौतुक केले. नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर देवून चालकांनी त्यांना उत्तम सेवा द्यावी. कोरोनामुळे मंडळ तोटय़ात आहे. परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रणाधिकारी पी. वाय. नायक यांनी स्वागत केले. उत्तमरित्या वाहने चालविणाऱया 125 चालकांना रौप्यपदक, 5 चालकांना सुवर्णपदक दिले.
यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, झोपडपट्टी विकास महामंडळाचे अध्यक्ष महेश कुमठळ्ळी, वायव्य परिवहन मंडळाचे केंद्रीय कार्यालयाचे अध्यक्ष व्ही. एस. पाटील, उपाध्यक्ष डॉ. बसवराज केलगार, परिवहन मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.