अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोग करणार पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
येत्या 4 जून रोजी राज्यातील 189 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे निश्चित केले असून त्यानंतर एक दोन दिवसात मतमोजणी होणार असल्याची माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. सदर तारीख अंदाजाने ठरवण्यात आली असून अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोग करणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
सध्या वॉर्ड पुनर्रचनेचे काम सुरू असून राज्य सरकार एकमेकांशी चर्चा विनिमय करून ते ठरवण्यात येत आहे. पुनर्रचना संपल्यानंतर आरक्षणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होणार नसून त्या पक्षविरहित असतील. चांगली काम करणारी माणसे पंचायत मंडळात येतील, अशी अपेक्षा गुदिन्हो यांनी वर्तविली.
वॉर्ड पुनर्रचना तसेच आरक्षणाचे काम निवडणूक आयोगावर सोपवण्यात आले असून काही निकष लावून ते काम करण्यात येत असल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली. आयोगाने 4 जूनला मतदान व 6 जून रोजी मतमोजणी अशी तारीख ठरवली आहे. सरकारने अजून त्यास संमती दिलेली नाही. तसा प्रस्ताव आयोगाकडून आला आहे. सरकारने मान्यता दिल्यानंतर आयोग अधिकृत तारीख जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. पुनर्रचनेचे काम अद्याप चालू असून ते संपलेले नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.