प्रतिनिधी /बेळगाव
रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त येथील विजया ऑर्थो आणि ट्रॉमासेंटरच्यावतीने ऑटोरिक्षा चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले.
रिक्षाचालकांनी मद्यपान करून रिक्षा चालवू नये. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबू नये, सुरक्षितपणे रिक्षा चालवावी, असा सल्ला देतानाच पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड घातला जातो, असे सांगितले. आपल्या वाहनात कागदपत्रे आवश्य ठेवावीत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वीरेश हिरेमठ म्हणाले, प्रत्येक रिक्षाचालक हा आपल्या कुटुंबाचा कणा असतो. कुटुंबाचा कणा मोडला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होवू शकते. त्यामुळे सुरक्षितपणे वाहने चालवावीत. कायदे आणि नियम पाळावेत.
यावेळी डॉ. सोमशेखर पुजार, सीईओ संजीव, प्रशासक राघवेंद्र, शिल्पा घोडगेरी, प्रताप आदी उपस्थित होते. शहरातील बहुसंख्य रिक्षाचालक यावेळी उपस्थित होते.