चिनी सैनिकांना सामोरे जाण्यासाठीची तयारी
वृत्तसंस्था / लेह
चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आयटीबीपीने स्वतःच्या जवानांना नवे निशस्त्र ‘आक्रमक’ युद्ध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 2020 मध्ये गलवान खोऱयात झालेली हिंसक झटापट पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. गलवान खोऱयात झालेल्या झटापटीत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. आयटीबीपीच्या प्रशिक्षणात ‘मार्शल आर्ट’चे विविध प्रकार म्हणजेच ज्यूडो, कराटे आणि क्राव मागाचे 15-20 वेगवेगळे युद्धाभ्यास सामील आहेत.
आयटीबीपीचे अनुभवी प्रशिक्षक सुमारे तीन महिन्यांपर्यंत हे प्रशिक्षण देणार आहेत. नव्या निशस्त्र युद्ध तंत्रज्ञानात रक्षणात्मक तसेच आक्रमक दोन्ही प्रकार सामील आहेत. माजी महासंचालक संजय अरोडा यांच्या निर्देशानुसार मागील वर्षी जवानांसाठी हे मॉडय़ुल अवलंबिले होते. हे युद्धकौशल्य विरोधकांना रोखण्यासह त्यांना अशक्त करणार असल्याचे आयटीबीपीचे महानिरीक्षक ईश्वर सिंह दुहन यांनी म्हटले आहे.
गलवान खोऱयात चीनने भारतीय सैनिकांवर क्रूर हल्ला करण्यासाठी दगड, टोकदार रॉड आणि एक प्रकारची काठी ‘क्लब’चा वापर केला होता. जून 2020 मध्ये भारतीय सैनिकांनी गलवानमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात चीनच्या निर्मितीकार्याला विरोध दर्शविला होता. या झटापटीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचे मानले जाते.
निशस्त्र युद्ध तंत्रज्ञानात विरोधकांना चोख प्रत्युत्तर देता येईल अशाप्रकारे स्वतःच्या शक्तीचा वापर करण्याचे प्रशिक्षण जवानांना देण्यात येत आहे. सीमा आणि अत्याधिक उंचीवर कुठल्याही जवानाला 90 दिवसांहून अधिक काळ तैनात केले जाणार नाही अशाप्रकारची योजना आम्ही आखली आहे. सीमा चौक्यांवरून जवानांचे योग्यवेळी स्थानांतरण होईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे दुहन यांनी म्हटले आहे.
नियमांचे कसोशीने पालन
या उपाययोजना आणि निर्देश पूर्वी नव्हते असे नाही, परंतु आता आम्ही या नियमांना गांभीर्याने लागू करत आहोत. आयटीबीपीने अनेक वैज्ञानिक मापदंडांचे अध्ययन केले. तसेच डीआरडीओच्या डिफेन्स इन्स्टीटय़ूट ऑफ ऍप्लाइड सायन्सेसकडून दीर्घकाळापर्यंत सैनिकांना तैनात केल्याने मानवी शरीराला नुकसान पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्याने अत्याधिक उंचीवर तैनात जवानांची तीन महिन्यांच्या कालावधीदरम्यान अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयटीबीपीकडून सांगण्यात आले.
29 महिन्यांपासून तणाव
भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान पूर्व लडाख क्षेत्रात 29 महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. पँगोंग सरोवर भागात हिंसक झटापटीनंतर 5 मे 2020 रोजी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते.