बेकिनकेरेत नुकसान, शेतकऱ्यांना फटका, वनखाते सुस्त
► प्रतिनिधी/ बेळगाव
बेकिनकेरे येथील कोवळ्या भात पिकांत गव्यांच्या कळपाने हैदोस घालून मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सातत्याने गव्यांकडून नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत वनखाते मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. मल्लाप्पा निचळे या शेतकऱ्याच्या एक एकर शेतीतील भात पिकाचे नुकसान झाले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील डोंगरपायथ्याशी असलेल्या शिवारात शेतकऱ्यांनी भात, बटाटा, भुईमूग, रताळी, मका, बाजरी आदी पिकांची पेरणी केली आहे. मात्र डोंगर परिसरातील गव्यांचे कळप नुकसान करू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनले आहेत. दरवर्षी गव्यांकडून नुकसान होत असले तरी वनखाते दुर्लक्ष करीत असल्याची तक्रारदेखील शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच पावसाअभावी पिके धोक्यात आली आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच गव्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
गव्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी काही शेतकऱ्यांनी पुंपण घातले आहे. मात्र याला न जुमानता गवे भर पिकांत धुडगूस घालू लागले आहेत. रात्रीच्या अंधारात येऊन गवे पिकांचे नुकसान करू लागले आहेत. त्यामुळे पिकांचे रक्षण कसे करावे, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर पडला आहे. डोंगर परिसरात गव्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याबरोबर साळिंद्र, रानडुक्कर, तरस, मोर, आदी वन्य प्राण्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शिवारात फिरणेदेखील धोकादायक बनले आहे.
गव्यांच्या कळपाकडून कोवळ्या भात पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे. बियाणे, खते, शेणखत, किटकनाशके यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. मात्र काही मिनिटात गव्यांकडून या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
मल्लाप्पा निचळे, (नुकसानग्रस्त शेतकरी)
एक एकर भात शेतीत गव्यांच्या कळपांनी हैदोस घालून पिकांचे नुकसान केले आहे. पायाखाली कोवळे भात सापडल्याने पूर्णपणे पिक वाया गेले आहे. वनखात्याकडे तक्रार केली असता. दुर्लक्ष झाले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करावा.