भातासह अन्य उन्हाळी पीकांचे नुकसान : जिह्याच्या बहुतांश भागास वळिवाने झोडपले
कोल्हापूर प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी दिवसभराच्या उष्म्यानंतर सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत कोल्हापूर शहारासह जिह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिह्याच्या अनेक भागात झालेल्या पावसामुळे उन्हाळी पीक काढणीमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. तर अनेक ठिकाणी कापणीस आलेले भात पिक भुईसपाट झाले असून मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये तापमानाचा पारा 38 ते 40 अंशापर्यंत पोहोचला आहे. दोन दिवसांपासून काहीअंशी ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानात घट झाली होती. मात्र सोमवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या दोन महिन्यांपासून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच उन्हाच्या झळाबरोबरच शेत पिकांच्या सिंचनासाठी पाणी टंचाईने ग्रासलेला बळीराजाही सुखावला आहे.
मार्च महिन्यापासूनच तापमानामध्ये कमालीची वाढ झाली. मे मध्ये तर तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला. त्यामुळे भारतीय वेधशाळेकडून मे महिन्यात राज्यात उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत जिह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा जेमतेम असल्यामुळे पाटबंधारे विभागाने एप्रिल अखेरपासून उपसाबंदीचे धोरण अवलंबल्यामुळे पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदी खोऱ्यामध्ये पावसाळ्यापर्यंत काहीअंशी उपसाबंदी केली आहे. तसेच जिह्यातील इतर नदी खोऱ्यामध्येही कमी अधिक प्रमाणात उपसाबंदी सुऊ आहे. त्यामुळे जिह्यातील शेतकऱ्यांना जोरदार वळीव पावसाची प्रतिक्षा होती. गेल्या दोन दिवसांपासून वळीव पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी वळीवाने हुलकावणी दिली होती. सोमवारी रात्री मात्र जिह्याच्या बहुतांशी भागास वळीव पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे माळरानासह इतर बागायती क्षेत्रातील खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असणारी मशागत करणे सोपे होणार आहे.
उन्हाळी पिक काढणीमध्ये व्यत्यय
जिह्याच्या ग्रामीण भागामध्ये भुईमूग, सुर्यफूल, मक्का, भात, ज्वारी आदी उन्हाळी पिकांच्या काढणीमध्ये या पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला. तर गारांमुळे वेलवर्गीय पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. हा पाऊस ऊस पिकासाठी पोषक ठरणार असला तरी अन्य पिकांसाठी नुकसानकारक ठरला आहे.
विद्युत पुरवठा खंडीत
जिह्यात वादळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत वाहीन्यांसह विद्युत खांब मोडून पडले होते. परिणामी बऱ्याच भागातील विद्युत यंत्रणा विस्कळीत होऊन वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणची संपूर्ण यंत्रणा ही उघड्यावरच असल्याने येणारा प्रत्येक पावसाळा हा महावितरणसाठी एक आव्हान असते. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी महावितरणने मान्सूननपूर्व कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली असून पावसाळ्यात अखंड वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सज्ज झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज असून ग्राहकांनी सतर्क राहावे,विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. नागारिकांनी कृपया घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.