Heavy RainFall In Maharashtra : कोकणासह आता विदर्भात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असून,रायगड, पालघर, सातारा जिल्ह्याला काल रेड अलर्ट देण्यात आला होता.मराठवाड्यात देखील कडकडाटासह विजांच्या शक्यतेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर हवामान विभागाने पुढील पाच दिवस पुणे,कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट दिला असून साताऱ्याला पुढील तीन दिवस अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवला आहे .दरम्यान आज सकाळी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकरवाडीवर मोठी दरड कोसळली यात 5 जणांचा मृत्यू झाला असून, 100 हून अधिक लोक अडकले आहेत.
काल दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे रात्री पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली. सध्या पंचगंगेची पाणापातळी 30 फुटांवर पोहचली असून,53 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. तर सकाळी 8 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 32.03 फुटावर आहे. तर पंचगंगा नदी इशारा पातळी 39 व धोका पातळी 43 आहे.धरणक्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात एका दिवसात तब्बल 5 ते 7 टक्यांनी वाढ झाली आहे. नद्यांनी पाणीपातलीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे नदी काठीवरील गावातील नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.