श्रावण विधी सोहळय़ा ब्रह्मेशानंद स्वामीजींचे
प्रतिनिधी / फोंडा
प्रकृतीच्या नियमाप्रमाणे हिंदू धर्माचे आचरण केले पाहिजे. ऋषिमुनींकडून हा सांस्कृतिक वारसा चालत आला आहे. आजची तरुणाई सांस्कृतिक गोष्टींकडे आकर्षित होताना दिसते हे समस्त विश्वासाठी सुचिन्ह आहे. हिंदूंना हिंदू म्हणून जगता आले पाहिजे. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ व मनुष्ययज्ञ या पंचमहायज्ञांचे आचरण हे हिंदूचे कर्तव्य आहे, असे आशिर्वचनपर प्रबोधन तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामीजींनी केले.
श्री दत्त पद्मनाभपीठ श्रीक्षेत्र तपोभूमी कुंडई येथे आयोजित केलेल्या ‘श्रावण विधी’ सोहळय़ात हजारो संख्येने भक्तगण उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, इथरनेट एक्सप्रेस या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर गोवेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या गुरुंकडे आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी येणे हीच खरी श्रावणी होय असे सांगून कित्येक वर्षांपासून ऋषिमुनींनी सुरु केलेली विज्ञानाधिष्ठीत आध्यात्मिक परंपरा सर्वांनी जपण्याचे आवाहन स्वामीजींनी पुढे बोलताना केले. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो भक्तगण या श्रावण विधीत सहभागी झाले होते. सकाळच्या सत्रात यज्ञोपवितधारण, हवन, तर्पण, मार्जन, सभादीपदान आदी विधी पार पडले. आरत्या, पसायदान व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.