वृत्तसंस्था/ बँकॉक
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये रविवारी भारतीय बॅडमिंटनपटूंनी नवा इतिहास घडविताना प्रतिष्ठेच्या थॉमस चषकावर आपले नाव पहिल्यांदा कोरले. येथे झालेल्या अंतिम लढतीत भारताने विद्यमान विजेत्या बलाढय़ इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकुर तसेच अभिनव बिंद्रा यांनी भारतीय बॅडमिंटन संघाचे खास अभिनंदन केले आहे. थॉमस चषक पटकाविणाऱया भारतीय बॅडमिंटन संघाला क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी एक कोटी रूपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
थॉमस चषकासाठी ही अंतिम लढत चुरशीची अपेक्षित होती पण आतापर्यंत या स्पर्धेच्या 70 वर्षांच्या इतिहासामध्ये 14 वेळा थॉमस चषकावर आपले नाव कोरणाऱया इंडोनेशियाची कामगिरी साफ निराशानजक झाली. भारतीय संघातील लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, तसेच सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांच्या दर्जेदार कामगिरीमुळे इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटूंना पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील जेतेपदामुळे नवचैतन्य आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला आहे. थॉमस चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळवून बलाढय़ इंडोनेशियाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित अँथोनी सिनीसुका जिनटिंगचा 8-21, 21-17, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळविणाऱया लक्ष्य सेनने आपल्या जबरदस्त स्मॅश फटक्यावर विजय हस्तगत केला. या सामन्यामध्ये लक्ष्य सेनने पहिला गेम गमविल्यानंतर पुढील दोन गेम्स जिंकून जिनटिंगचे कडवे आव्हान संपुष्टात आणले. पुरूष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रनकीरेड्डी यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान व केव्हिन संजया सुकामुल्जो यांचा 18-21, 23-21, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करून भारताची आघाडी 2-0 अशी केली. या दुहेरीच्या सामन्यात सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी क्रॉसकोर्ट अचूक फटक्यावर अधिक भर दिला होता.
त्यानंतर एकेरीच्या दुसऱया सामन्यात किदांबी श्रीकांतने इंडोनेशियाच्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जोनातन ख्रिस्तीचा 21-15, 23-21 अशा सरळ गेम्सनी 48 मिनिटात पराभव करत जेतेपद निश्चित केल्यानंतर श्रीकांतसह भारतीय खेळाडूंनी जल्लोष सुरू केला. ख्रिस्ती आणि श्रीकांत यांच्यात आतापर्यंत दोनवेळा गाठ पडली असून श्रीकांतने दोन्ही सामन्यात ख्रिस्तीचा पराभव केला आहे.
भारतीय संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
थॉमस चषक पहिल्यांदा जिंकून भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात नवा इतिहास घडविणाऱया भारतीय बॅडमिंटन संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे. बँकॉकमध्ये झालेल्या या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची ही कामगिरी अभिमानास्पद असून देशातील अनेक नवोदित क्रीडापटूंना या कामगिरीमुळे प्रोत्साहन मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. संपूर्ण देशाला या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केली. ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्रानेही थॉमस चषक जिंकणाऱया भारतीय बॅडमिंटन संघाचे खास अभिनंदन केले आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील रविवारचा हा दिवस ऐतिहासिक म्हणून नोंदविला जाईल. भारताची माजी टॉप सीडेड महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाचे खास अभिनंदन केले आहे. बॅडमिंटन क्षेत्रातील भारताने मिळविलेला हा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल, असेही सायनाने म्हटले आहे.
खेळाडूंच्या डोळय़ांत आनंदाश्रू
ख्रिस्तीविरुद्ध विजयी फटका मारल्यानंतर भारताच्या पूर्ण पथकाने जल्लोष सुरू केला. सर्वच खेळाडूंनी कोर्टवर धाव घेत सेलेब्रेशनला सुरुवात केली. अविस्मरणीय व अविश्वनीय कामगिरी केल्याने सर्वांसाठीच हा भावनिक क्षण होता आणि पुरस्कार वितरणावेळी हा भावनिक बांध फुटला. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर खेळाडूंचे आनंदाश्रूने पाणावले होते. पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक तर केले आहेच, पण त्यांना आपल्या निवासस्थानी निमंत्रितही केले आहे.