शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
ऊस दरासाठी शेतकऱयांनी आंदोलन केल्यानंतर 15 तारखेला बेंगळूर येथे साखर मंत्री आणि शेतकऱयांची बैठक होणार आहे. त्याचदिवशी बेळगाव येथेही साखर कारखानदार, साखर आयुक्त यांच्याबरोबर शेतकऱयांची बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र या बैठकीला सर्व साखर कारखानदार उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा हा तिढा सुटणार नाही. तेंव्हा सर्व साखर कारखानदारांच्या व्यवस्थापकांना याची माहिती द्या आणि सर्वजण उपस्थित राहिल्यानंतरच बैठक घ्या, यासाठी शेतकऱयांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे.
उसापासून साखर कारखानदार विविध प्रकारे उत्पादन घेत आहेत. मात्र शेतकऱयांना साखरेचा दरच सांगून शेतकऱयांची फसवणूक करत आहेत. इथेनॉल, बगॅस, अल्कोहोल याचबरोबर काही साखर कारखाने वीजनिर्मिती करत आहेत. उत्पादनाचा लेखाजोखा दिला जात नाही. ही केवळ शेतकऱयांची फसवणूक असून सरकारने यावर योग्य तोडगा काढून शेतकऱयांना योग्य भाग द्यावा, अन्यथा आमचे आंदोलन सुरूच ठेऊ, असा इशारा नेगील योगी रयत सेवा संघ आणि भारतीय कृषक संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे देण्यात आला आहे.
प्रतिटन 5 हजार 500 रुपये दर द्यावा, कारण उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत आहे. शेतकऱयांची पिळवणूक होत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
बेंगळूर येथील बैठकीत साखर मंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा
बेंगळूर येथेही होणाऱया बैठकीला शेतकरी उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी साखर मंत्र्यांनी योग्य तो निर्णय द्यावा, सुवर्णसौध येथे बैठक घ्यावी, त्या बैठकीतही शेतकऱयांना योग्य तो निर्णय द्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा अहोरात्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सिद्धगौडा मोदगी, जयश्री गुरण्णावर, चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र नाईक, प्रसाद कुलकर्णी, यल्लाप्पा खानप्पण्णावर, जी. व्ही. कुलकर्णी, शिवलिला मिसाळे, एम. एम. मकानदार, शेखर अक्कण्णावर, मारुती हणमंण्णावर, सिद्राय अंगडी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.