दोन ते तीन तास अडकली वाहने : भाविकांची झाली गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
खणगाव येथील काळादेवीची यात्रा बुधवारी असल्यामुळे मोठय़ा संख्येने भाविक सकाळपासून गावात दाखल होत होते. त्यामुळे मुचंडीपासून खणगाव गावापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे खणगाव गावापर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. यामुळे अनेकांचे हाल झाले. बस व वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांची घालमेल झाली. गर्दी होणार हे माहिती असतानाही पोलिसांकडून कोणतेच नियोजन नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा सूर वाहनचालकांमधून उमटत होता.
काळादेवीची यात्रा मंगळवारी व बुधवारी पार पडली. मागील आठ दिवसांपासून सुरू असणाऱया पावसाने बुधवारी उघडीप दिल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली. बेळगाव-गोकाक मुख्य मार्गावर खणगाव असल्यामुळे कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली. बेळगावहून गोकाकला तर गोकाकहून बेळगावला येणाऱया 10 ते 12 बस या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या.
दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यातच गोकाकवरून येणारी बस बंद पडल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली. त्यामुळे जेथून वाट मिळेल तेथून वाहने रेटली जात होती. अनेकांनी खणगाव येथून सुळेभावीमार्गे बेळगावला येणे पसंत केले. वाहतूक कोंडी पाहता जत्रेचे जेवण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली.
बसमधील प्रवाशांची गैरसोय बेळगाव ते गोकाक दरम्यान धावणाऱया परिवहनच्या बस दोन ते अडीच तास कोंडीत अडकल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवासाला लागलेल्या वेळेमुळे बसमधील प्रवासी व वाहनचालक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग होत होते.