वृत्तसंस्था/ अमृतसर
वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहचा विविध संघटनांकडून विरोध केला आहे. अमृतपालसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्वत:च्या विरोधकांना प्रत्युत्तर देत अमृतपालने मी पंजाबी असून पंजाबमध्ये राहण्याचा मला अधिकार असल्याचे म्हटले आहे. माझ्या पूर्वजांनी पंजाबसाठी स्वत:चे रक्त सांडले आहे. माझ्यासंबंधी आक्षेप असलेल्या लोकांनीच पंजाब सोडावे असे अमृतपालने सुनावले आहे.
यापूर्वी अमृतपालने आपण भारतीय नागरिक नसल्याचा खुलासा केला होता. यानंतर त्याच्यासंबंधी वाद निर्माण झाला आहे. भारतीय नसतानाही तो भारतात काय करतोय असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत.
अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी अमृतपालसोबत बैठक घेत चर्चा केली आहे. अजनाला पोलीस स्थानकाला घेराव घालताना श्री गुऊ ग्रंथ साहिबचा गैरवापर केल्याचा आरोप अमृतपालवर आहे. पंजाब हा भारताचा अविभाज्य भाग नसल्याचे वक्तव्य अमृतपालने काही दिवसांपूर्वे केले होते. लाहोर आणि ननकाना साहिबशिवाय पंजाब पूर्ण नसल्याचे त्याने म्हटले होते.