ऑनलाईन टीम/तरुण भारत
मी मुंबईबाहेर ६ महिन्यांनी पाऊल टाकलं आहे. पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची (Shivsena) ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर (sambhajinagar) करणार असं वचन बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी दिलं होतं. हे वचन मी अद्यापही विसरलेलो नाही. हे वचन मी पूर्ण करणार आहे. पण नावाला शोभेल असं शहर उभं करायचं आहे. नामांतरणाची सुरुवात म्हणून आधी विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करणार आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले. ते औरंगाबाद येथील सभेत बोलत होते.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता असताना कोणी लक्ष देत नाही. पण सत्ता गेली की यांच्या अंगात येतं. सत्तेतून बाहेर पडल्यावर यांनी औरंगाबादच्या नामांतरणावरून लक्ष्य करायला सुरुवात केली. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी वचन दिल्याप्रमाणे औरंगाबादचं नाव संभाजीनगर नक्की होणार. हे वचन मी पूर्ण करणार. पण त्याआधी विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करा, असा प्रस्ताव मी केंद्राकडे केला आहे. हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी भाजपाने केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना दिले.
पाणी प्रशांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी दिलेलं वचन पूर्ण करणार आहे. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार. तसेच औरंगाबादच्या नामकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले, मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. त्यामुळे बाळासाहेबांनी दिलेलं वाचन मी पूर्ण करणार असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, औरंगाबाद शहरात आधी रस्ते, पाण्याची कामं करून दाखवेन आणि नंतरच शहराचं नाव बदलेन असं उद्धव ठाकरे म्हणाले. शहराचं नुसतं नाव बदलून उपयोग नाही, ज्या संभाजी राजेंचं नाव शहराला द्यायचंय त्या शहराची बिकट अवस्था असेल तर त्यांना काय वाटेल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेली त्याच्यासाठी होता. पाण्यासाठी तो आक्रोश असता तर आमच्या आधी पाच वर्ष तुम्हीच होता. आम्ही तुमच्यासोबत होतो. का नाही केलं काम? खोटं बोलणं आमचं हिंदुत्व नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंनी मागणी करताच बाळासाहेबांनी भाजपाला संभाजीनगरचं महापौर पद दिलं. संभाजीनगरच्या विषयी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा ते यावेळी महापौर आम्हाला द्या, अशी मागणी केली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाही, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.
बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कधीच मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे.
भाजपाने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर तेही करू, असा इशारा यावेळी ठाकरे यांनी दिला.