वसिम खान : आयसीसी महाव्यवस्थापक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला 7 जूनपासून सुरू होणाऱ्या लंडनमधील ओव्हल येथील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या किमान पहिल्या चार दिवशी खचाखच गर्दीची अपेक्षा आहे. हवामान खराब झाल्यास ती कसर भरून काढण्याकरिता आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे.
आम्ही स्थानिक आयोजन समितीसोबत (ईसीबी) खूप जवळून काम करत आहोत, जेणेकरून चाहत्यांसाठी ती एक पर्वणी ठरावी. आम्ही किमान पहिल्या चार दिवसांत पूर्ण गर्दीची अपेक्षा करत आहोत. आम्हाला माहीत आहे की, आम्ही योग्य दिशेने जात आहोत. अंतिम सामन्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे आणि जगातील दोन सर्वोत्तम संघ यात झुंजणार असल्याने ही एक विलक्षण लढत ठरेल. आम्हाला आशा आहे की, हवामान चांगले राहील, जेणेकरून पूर्ण क्रिकेट पाहायला मिळू शकेल. तरीही आमच्याकडे वेळ गमावल्यास तो भरून काढण्यासाठी राखीव दिवस आहे, असे आयसीसीचे महाव्यवस्थापक वसिम खान यांनी निवडक प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
शुभारंभी स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताचाही समावेश होता आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या त्या सामन्यात साउथहॅम्प्टनमध्ये न्यूझीलंडसमोर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सलग दुसऱ्यांदा हा सामना ब्रिटनमध्ये का खेळविला जात आहे असे विचारले असता वसिम म्हणाले की, अंतिम सामन्याच्या वेळापत्रकानुसार हे स्थान चांगले आहे. ओव्हल हे दोन्ही संघांसाठी तटस्थ ठिकाण म्हणूनही काम करते.
जागतिक कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक ज्या प्रकारे आखलेले आहे त्यानुसार उत्तर गोलार्धात उन्हाळ्यात हा अंतिम सामना खेळविला जातो. सध्या तरी इंग्लंडमध्येच आम्ही यासाठी विविध ठिकाणे शोधतो. लॉर्ड्सचा विचार करण्यात आला होता. पण हा अंतिम सामना ओव्हलवर खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे वासिम यांनी सांगितले. दर दोन वर्षांनी खेळविल्या जाणाऱ्या अंतिम फेरीचा विचार करता इंग्लंड त्यासाठी खूप अनुकूल आहे, असे ते म्हणाले.
या स्पर्धेच्या अंतर्गत प्रत्येक संघ दोन वर्षांत सहा मालिका खेळतो. त्यापैकी तीन मायदेशी आणि तीन दूरस्थ मालिका असतात. विद्यमान रचना कसोटी क्रिकेटसाठी चांगल्या प्रकारे काम करत आहे, असे मतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आम्ही खेळण्याच्या परिस्थितीत छोटे बदल केले आहेत, सॉफ्ट सिग्नल पद्धत यावेळी नसेल. स्पर्धेच्या दोन वर्षांच्या रचनेचा सदस्यांकडून सतत आढावा घेतला जातो. पुढील वर्षात जाण्यापूर्वी आम्ही त्यांचा अभिप्राय घेतो. पण चांगली बातमी ही आहे की, जागतिक कसोटी स्पर्धा किमान पुढील आठ वर्षांसाठी निश्चित झालेली आहे, असे वासिम यांनी सांगितले.