मुख्यमंत्री : पोलिस मुख्यालयात घेतली सुरक्षा आढावा बैठक
प्रतिनिधी /पणजी
राज्यात सध्या नाताळ सणाची व नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्र्वभूमीवर राज्यात पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल होणार आहेत. पर्यटकांना चांगली सेवा मिळावी आणि त्यांची व्यावसायिकांकडून फसवणूक होऊ नये, यासाठी सरकार दक्ष आहे. जर पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे अकारणी झाल्यास तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
पोलिस मुख्यालयात आयोजित केलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध खात्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, नाताळ व नववर्ष स्वागतामुळे सुरक्षेसंबंधी सरकारकडून खबरदारी घेण्यात आली असून, तशा सूचना पोलिस व वाहतूक पोलिस खात्याला करण्यात आल्या आहेत. सर्व किनाऱयांवर पोलिसांची कडक गस्त राहणार असून, ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाईल. किनाऱयावर उघडय़ावर बेकायदेशीरपणे संगीताचे कार्यक्रम (डान्स बार) सुरू असेल तर अशा व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, रेन्ट अ बाईक आणि रेन्ट अ कारची नोंदणी असणाऱया व्यावसायिकांच्याच टॅक्सींना व्यावसाय करण्यास मुभा आहे, तरीही काहीजण खासगी वाहने भाडय़ाने देत आहेत. आता पोलिसांची यावर करडी नजर असून, खासगी चार चाकी वाहने किंवा दुचाकी भाडय़ाने दिल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
मोपा विमानतळ परिसरात पोलिसांच्या सुरक्षेव्यवस्थेवर अधिक भर देण्यात आला असून, तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. गोव्यात येणाऱया पर्यटकांनी किंवा इतरांनी राहण्यासाठी हॉटेल बूक करताना गोवा टय़ुरिझमच्या वेबसाईडचाच वापर करून हॉटेल बूक करावीत आणि असे होण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.
बेकायदा वास्तव्य करणाऱया परदेशी पर्यटकांची माहिती पोलिसांतर्फे मिळवणे सुरू असून, व्हीसा संपूनही राज्यात वास्तव्य करून असणाऱया परदेशी पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सक्रीय आहेत. जर अशा व्यक्ती सापडल्यास किंवा आढळल्यास नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. डेस्टीनेशन सेंटर उभारणीत गोवा हे अव्वल ठरले आहे. कारण दिल्लीनंतर डेस्टीनेशन सेंटर असणारे एकमेव राज्य हे गोवा असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.
तर पालकांवरच कठोर कारवाई
राज्यात अल्पवयीन मुले वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालवत आहेत. हल्लीच वास्को येथे अल्पवयीन मुलगा अपघातात ठार झाला आहे. अशा घटनांना केवळ पालकच जबाबदार असून, अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. तरीही पालक आपल्या मुलांना वाहन परवाना नसतानाही वाहने चालवण्यास देतात. आता जर असे प्रकार घडल्यास किंवा पोलिसांना तसे आढळल्यास संबंधित पालकांवर कठोर कारवाई करून त्यांचा कायमस्वरुपी वाहनपरवाना निलंबित केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.