म्हैसूरच्या तज्ञ डॉक्टरांकडून उपचार
बेळगाव : भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील आजारी वाघ शौर्यची प्रकृती सुधारत आहे. म्हैसूर येथील डॉ. मदन कोमपाल यांचा औषधोपचार व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखभालीमुळे शौर्यच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उलटी-जुलाबाने शौर्यची प्रकृती खालावली होती. त्यामुळे साहजिकच वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याच्या आरोग्याविषयीची चिंता वाढली होती. नेमक्या कोणत्या आजाराने हा वाघ त्रस्त आहे, याचाही उलगडा झाला नव्हता. मात्र, म्हैसूर येथील वन्यजीवी डॉ. मदन यांनी केलेल्या तपासणीअंती त्याच्या आजाराचे निदान लागले आहे. अधिकाऱ्यांनी शौर्यच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्या होत्या. मात्र, आजाराचे निदान झाले नव्हते. केवळ शौर्यच नव्हे तर अलीकडे वन्यप्राण्यांचा अकाली मृत्यूची प्रकरणे वाढली होती. त्यामुळे चिंतेत भर पडली होती. आजाराचे निदान झाल्यामुळे शौर्यवर योग्य औषधोपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाचे संचालक व उपवनसंरक्षणाधिकारी हर्ष बानू यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राणीसंग्रहालयाचे डॉ. नागेश हुईलगोळ, आरएफओ केंपण्णा वण्णूर, प्रतिभा कोप्पळ आदींनी सतत शौर्यच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत.