म. ए. समितीचे बळवंतराव सायनाक यांनी गड राखला, बाबुराव ठाकुरांनी दाखवून दिला मराठी बाणा!
ही कथा आहे 1978 मधील विधानसभा निवडणुकीची. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पतन होऊन मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर एक वर्षाच्या आतच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात जाहीर झाल्या. जनता पक्षातील बलाढ्या नेते बेळगाव येथे प्रचारसभांमधून मतदारांना साद घालू लागले. दस्तुरखुद्द पंतप्रधान मोरारजी देसाई 11 फेब्रुवारीला प्रचारासाठी दाखल झाले. मोरारजीभाईंच्या स्वागतासाठी मान्यवर नेते उपस्थित होते. ‘तरुण भारत’चे संस्थापक आणि सीमालढ्यातील अग्रणी नेते बाबुराव ठाकुर यांचाही यामध्ये समावेश होता. उपस्थितांनी पुष्पहार घालून मोरारजींचे स्वागत केले. अपवाद होता तो बाबुराव ठाकुर यांचा. मोरारजीभाईंशी त्यांनी हस्तांदोलन केले आणि म्हणाले, ‘मी तुमच्यासाठी पुष्पहार आणलेला नाही’. त्यावर मोरारजी म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय आपण मला हार कसा घालणार?’ आणि एकच हास्यकल्लोळ पहावयास मिळाला.
(बाबुराव ठाकुर आणि मोरारजी देसाई स्वातंत्र्यलढ्यात एकाच कोठडीत होते. परिणामी उभयतांचे संबंध सलोख्याचे होते. मात्र, सीमाप्रश्नामुळे उभयतांची भूमिका परस्परविरोधी होती. या पार्श्वभूमीवर या उभयतांची भेट झाली ती अशी.)
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठीच पंतप्रधान येथे आले होते. त्यासाठी जनता पक्षाच्या उमेदवाराला दोन्ही काँग्रेस पक्षांनी पाठिंबा दिला होता. ही अजनबी बात असल्याचे सांगून मोरारजी म्हणाले, ‘या पाठिंब्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहण्यासाठी मी त्यांना मुभा दिली आहे’.
म. ए. समिती एका बाजूला आणि तिन्ही पक्ष एका बाजूला अशी लढत स्पष्ट झाली. पंतप्रधानांच्या सभेमुळे निश्चितच वातावरण बदलणार, असा आत्मविश्वास जनता आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये वाढू लागला. त्यांनी लागलीच वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो केविलवाणा ठरला. 26 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाले. पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा आशीर्वाद लाभलेल्या एम. एन. नांगनूर यांचा पराभव झाला. म. ए. समितीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी जनता व दोन्ही काँग्रेस पक्षाच्यावतीने नांगनूर यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. तो डाव म. ए. समितीने हाणून पाडला. बळवंतराव सायनाक 12081 इतक्या मताधिक्क्याने विजयी झाले. समितीचा गड अभेद्य राहिला.
जवळच असलेल्या उचगाव मतदारसंघातूनही प्रभाकर पावशे यांनी विजयश्री संपादन केली. त्याचबरोबर बागेवाडी येथून श्री. जी. एल. अष्टेकर, खानापुरातून निळकंठराव सरदेसाई आणि निपाणी येथून बाळूमामा चव्हाण यांनी समितीचा झेंडा रोवला. या निवडणुकीत म. ए. समितीचे पाच उमेदवार विजयी झाले.
मतदारांची प्रतिक्रिया बोलकी होती. मतदारांनी नांगनूर यांच्याबरोबरच पंतप्रधानांचा पराभव केला आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. तर मोरारजीभाई यांनी या निवडणुकीचा संबंध सीमाप्रश्नाशी जोडू नये, अशी सारवासारव केली. हे सारे झाले ते म. ए. समितीच्या जिद्दीमुळेच!