जपानच्या पंतप्रधानांचे प्रतिपादन ः मोदींना जी-7 शिखर परिषदेचे निमंत्रण ः करारांनाही चालना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांचे दोन दिवसांच्या भारत दौऱयासाठी सोमवारी नवी दिल्लीत आगमन झाले. दौऱयाच्या सुरुवातीला त्यांनी राजघाट गाठून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. येथे दोन्ही बाजूंनी शिष्टमंडळ स्तरावर परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्यांबरोबरच जी-7 आणि जी-20 या आपापल्या अध्यक्षपदांच्या प्राधान्यांवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी किशिदा यांना चंदनापासून बनवलेली बुद्धमूर्ती भेट दिली.
जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांनी भारत दौरा द्विपक्षीय संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले. दोन्ही देशांचे सर्वोच्च नेतृत्व एकमेकांच्या सतत संपर्कात असून सामरिक आणि परस्पर समस्यांवर वेळोवेळी चर्चा होत असल्याचेही ते म्हणाले. मी आज पंतप्रधान मोदींना हिरोशिमा येथे होणाऱया जी-7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले असून त्यांनी आपले निमंत्रण स्विकारल्याचे किशिदा म्हणाले. तसेच गेल्या वर्षभरात मी जपानच्या पंतप्रधानांना अनेकदा भेटलो. या भेटीदरम्यान मला दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल नेहमीच सकारात्मकता वाटली. आज मी त्यांच्याशी आमच्या जी-20 अध्यक्षपदाच्या प्राधान्यांबद्दल बोललो. सर्वांना बरोबर घेऊन जाणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
जागतिक समस्यांवर चर्चा
यावषी जपान जी-7 चे अध्यक्षपद भूषवत असतानाच भारत जी-20 ची धुरा सांभाळत आहे. जपानी पंतप्रधानांच्या भेटीमुळे दोन्ही देशांना जी-20 आणि जी-7 मध्ये सहकार्य आणण्याची संधी मिळेल. जी-20 आणि जी-7 देश अन्न आणि आरोग्य सुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि आर्थिक सुरक्षा यावर एकत्र कसे काम करू शकतात यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा करणे अपेक्षित आहे.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताला महत्त्व
आज इंडो-पॅसिफिक प्रदेशाकडे एकच भौगोलिक प्रदेश म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात भारताची भूमिका खूप महत्त्वाची आहे. भारत अगदी मध्यभागी आहे. हिंद महासागरावर भारताचे वर्चस्व पाहता, भारताशिवाय प्रशांत महासागरात शक्तीचे स्थिर संतुलन निर्माण करणे शक्मय नाही. हा शिंजो आबे यांनी मांडलेला मुद्दा आबे यांचे उत्तराधिकारी किशिदा पुढे नेत आहेत. या महत्त्वाच्या मुद्दय़ावरही शिष्टमंडळ पातळीवरील बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
जपानी भाषा, बुलेट ट्रेनसंबंधी करार
द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि जपानमध्ये दोन महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांच्या भारत दौऱयादरम्यान झालेल्या बैठकांची माहिती दिली. यावेळी दोन करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी पहिले जपानी भाषेतील ‘एमओसी’च्या (सहकार मेमोरँडम) नूतनीकरणाशी संबंधित आहे. हा करार मूलतः उच्च स्तरावरील भाषा शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच दुसरा करार मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाशी संबंधित आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात पेडिट कराराच्या चौथ्या टप्प्यावर स्वाक्षरी करण्यात आली. याप्रसंगी दोन्ही देशाच्या नेत्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचा आढावाही घेतला.