रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांची लागणार कसोटी, भारतीय फिरकी माऱ्यावर मोठी जबाबदारी
वृत्तसंस्था/ नागपूर
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची सर्वांत मोठी कसोटी ही आज गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत लागणार असून दुसऱ्या बाजूने मागील पराभवांचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक झालेला आहे. त्यामुळे ही मालिका चुरसपूर्ण व धक्के देणारी ठरण्याची लक्षणे पुरेपूर दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर यात घडणारी कामगिरी ही खेळाडूंच्या कारकिर्दीला महत्त्वपूर्ण वळण देऊन जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मालिकेतील खराब कामगिरीमुळे काहींची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते.
स्वगृही भारताविरुद्ध 2018-19 आणि 2020-21 अशा पाठोपाठ दोन मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला असल्याने कमिन्स आणि त्याचे सहकारी निश्चितच वचपा काढण्याचा उद्देश बाळगूनच आज मैदानात उतरतील. मात्र पहिल्या दिवसापासूनच खेळपट्टीवर चेंडू वळू लागेल अशी चर्चा चालली आहे. 2001 च्या मालिकेपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामने काही वेळा अॅशेसपेक्षा जास्त चुरसपूर्ण राहिलेले आहेत. त्यामुळेच स्टीव्ह स्मिथने भारतात मालिका जिंकणे हे अॅशेसपेक्षा मोठे ठरेल, असे उद्गार काढलेले आहेत. कमिन्सच्या संघाला आपले हेतू फलदायी ठरण्यासाठी 2004 मध्ये भारतात मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, ग्लेन मॅकग्रा व अॅडम गिलख्रिस्ट यांनी बजावलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती घडवावी लागेल.
रोहितच्या नेतृत्वगुणांचा लागेल कस
मोठ्या संघांविऊद्धचे कसोटी सामने किंवा मालिका दुखापतींमुळे (दक्षिण आफ्रिका व बांगलादेशविऊद्ध) किंवा आजारपणामुळे (इंग्लंडविरुद्ध) हुकलेल्या रोहित शर्माला विराट कोहलीच्या पावलांवर पाऊल ठेवून संघाला दुसऱ्यांदा जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचविणे निश्चित आवडेल. पण तसे होण्यासाठी भारताला दोन सामन्यांच्या स्पष्ट फरकाने विजय मिळविण्याची आवश्यकता आहे. रोहितचे सर्वांत मोठे शस्त्र ही फिरकीपटूंची चौकडी असेल, ज्यापैकी तिघांना खेळविले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नॅथन लियॉनच्या आव्हानाचा सामना फलंदाजांना करावे लागेल. गेल्या वषी ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकातील असमाधानकारक कामगिरीनंतर ‘टी20’ संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आलेल्या रोहित शर्माला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याच्या दृष्टीनेही ही मालिका महत्त्वपूर्ण आहे.
रिषभ पंतची उणीव जाणवणार
रोहितला रिषभ पंतची उणीव भासणार असून संघ ती कशी भरून काढतो त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. यष्टीरक्षक म्हणून के. एस. भरतकडे प्रभावी क्षमता आहे. त्याने रणजी स्तरावर त्रिशतकही झळकावलेले असले, तरी उच्च दर्जाच्या कसोटी गोलंदाजीचा तो कसा सामना करतो त्याकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीच्या हृतिक शोकिनच्या वेगवान ऑफ-ब्र्रेकविरुद्ध त्याला ज्या प्रकारे संघर्ष करावा लागला होता ते पाहता तो नॅथन लियॉनसारख्या फिरकीपटूचे आव्हान कसे काय पेलतो ते पाहावे लागणार आहे.
डावखुरा इशान किशन फलंदाजीतीला कौशल्याच्या बाबतीत पंतच्या जवळ जाणारा असला, तरी चेंडू भरपूर वळू लागल्यावर यष्टीरक्षकाची कसोटी लागणार असून यष्टिचीत करण्याची संधी गमावण्याचा किंवा कमी उंचीवरील झेल सुटण्याचा धोका रोहित वा प्रशिक्षक राहुल द्रविड यांना परवडणारा नाही. काहींच्या मते, रोहितला राहुलला ताबडतोब वगळण्याची गरज आहे. परंतु कसोटीच्या दोन दिवस आधी त्याला पत्रकार परिषदेला पाठविण्यात आल्याने खराब कामगिरी घडूनही त्याची जागा पक्की असल्याचा संदेश गेलेला आहे. याचा अर्थ असा की, सूर्यकुमार व गिल या सामने जिंकवून देऊ शकणाऱ्या खेळाडूंपैकी एकाला बाहेर बसावे लागेल.
गोलंदाजांची निवड करताना लागेल कसोटी
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकाची निवड करतानही रोहित शर्माची कसोटी लागणार आहे. मात्र अक्षरला कौल मिळण्याची जास्त शक्यता दिसत आहे. भारत चार फिरकीपटू खेळवून रविचंद्रन अश्विनकडे नवीन चेंडू सोपवू शकतो, अशीही चर्चा चालली आहे. पण दोन्ही बाजूंनी कोरड्या असलेल्या खेळपट्टीवर चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ शकतो आणि अशा वेळी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे दोघेही उपयोगी ठरू शकतात.
ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत असे दिसते आहे की, मिशेल स्वेप्सनच्या ऐवजी लियॉनचा फिरकी सहकारी म्हणून तळाकडे उत्तम फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या अॅश्टन आगरला पसंती मिळेल. वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत स्कॉट बोलंड कर्णधार कमिन्ससमवेत नवीन चेंडू हाताळण्यास सिद्ध झालेला आहे. ऑस्ट्रेलियन संघ डावखुऱ्या फलंदाजंनी भरलेला आहे आणि डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड आणि अॅलेक्स केरी हे डावखुरे फलंदाज खेळणे जवळजवळ निश्चित आहे. स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हे दोन उजव्या हाताने खेळणारे फलंदाज आहेत ऑस्ट्रेलियाला पॅमेरॉन ग्रीनची उणीव जाणवणार असून त्यामुळे पीटर हँड्सकॉम्ब आणि मॅट रेनशॉ यांच्यापैकी एकाची अतिरिक्त फलंदाज म्हणून निवड होऊ शकते.
संघ: भारत: रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुबमन गिल, रवींद्र जडेजा, के. एस. भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्बे, नॅथन लियॉन, अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, लान्स मॉरिस, मिचेल स्वीपसन, टॉड मर्फी, जोश हेझलवूड (अनुपलब्ध), पॅमेरॉन ग्रीन (अनुपलब्ध), मिचेल स्टार्क (दुसऱ्या कसोटीतून).
सामना सुरू होण्याची वेळ : सकाळी 9.30 वा.