वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बहरिनमधील मनामा येथे झालेल्या 2022 सालातील कनिष्ठांच्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेमध्ये भारतीय महिला मल्लांनी विविध वजन गटामध्ये पदके मिळविली असली तरी त्यांना शेवटी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली. भारताच्या अंतिमने 53 किलो गटात, प्रियांकाने 65 किलो गटात आणि आरजूने 68 किलो वजन गटात सुवर्ण पदके मिळविली. स्वीटीने 50 किलो गटात, रिनाने 55 किलो गटात, बिपाशाने 72 किलो गटात आणि प्रियाने 76 किलो गटात रौप्य पदके घेतली. सितोने 57 किलो गटात, तनू मलिकने 59 किलो गटात, सारिकाने 62 किलो वजन गटात कांस्य पदके मिळविली.
या स्पर्धेत जपानने गुणतक्त्यात 202 गुणांसह पहिले स्थान तर भारताने 200 गुणांसह दुसरे आणि उझ्बेकने 145 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती लढतींना प्रारंभ होत आहे.