वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱयावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. बोर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांकरिता अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून के. एल. राहुलकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये खेळविला जाणार आहे. दुसरा सामना दिल्लीत तर तिसरा धर्मशाला आणि चौथा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये रविंद्र जडेजाचा समावेश करण्यात आला असला तरी त्याच्या तंदुरुस्ती चाचणीनंतरच त्याला संघात स्थान दिले जाईल.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एस. भरत (यष्टीरक्षक), ईशान किसन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट आणि सूर्यकुमार यादव.